तुफान पाऊस, वाहतूक कोंडीने मुंबई बेजार

वीकेण्डपासून सुरू झालेला पावसाचा धिंगाणा मंगळवार उजाडला तरी कायम आहे. मंगळवारी सकाळपासून शहर व उपनगरात पावसाची जोरधार कायम होती. अंधेरी, सांताक्रूझ, वांद्रे, दादर, वरळी आदी भागात मुसळधार पाऊस बरसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. पावसाचा मारा आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईची चाल मंदावली होती. पावसाचा हा प्रभाव येते २४ तास मुंबईसह राज्यातील विविध भागात कायम राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर शहर परिसरात रिपरिप करत बरसणा-या पावसाने गेला आठवडाभरापासून चांगलाच जोर धरला आहे. दिवसभरात अल्पकाळाची विश्रांती सोडता मंगळवारी पावसाने तुफानी बॅटींग केली. यामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा न होता तळी तयार झाली होती. छत्री, रेनकोट घेत रस्त्याच्या कडेने, साचलेल्या डबक्यातून उडय़ा मारत वाट काढण्याची प्रत्येकाची लगबग सुरू होती. लोकलमध्ये इतरवेळी खिडकीची जागा पकडण्यासाठी शर्यत लावणारे मुंबईकर आता मात्र पावसामुळे खिडकी सोडून बसत असल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाचा प्रभाव दिवसभर कायम राहिल्याने कमाल तापमानाचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या खाली स्थिरावला आहे. कुलाबा येथे कमाल २८.२ अंश सेल्सिअस, किमान २५.२ अंश सेल्सिअस, ६५.८ मि.मी. पावसाची नोंद तर सांताक्रूझ येथे कमाल २८.१ अंश सेल्सिअस, किमान २४.६ अंश सेल्सिअस आणि ४९.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. येते २४ तास मुंबई शहर परिसरात पावसाचा प्रभाव कायम राहणार असून एक-दोन मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे, तर कोकण-गोवा, विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर वा-यांचा वेग कायम राहणार असल्याने समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *