पाकिस्तानच्या तुरुंगात अनेक वर्षे खितपत पडलेल्या सरबजित सिंग यांच्या जीवनावर आधारित ऐश्वर्या-रणदीपच्या अभिनयाने सजलेला ‘सरबजीत’ हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. परदेशी नामकंनामध्ये भारताकडून ‘सरबजीत’ या चित्रपटाची निवड करण्यात आली असल्याचे वृत्त india.com ने दिले आहे. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात डांबण्यात आलेल्या पंजाबच्या सरबजीत सिंहची कैद्यांकडून हत्या करण्यात आली आणि तमाम भारतीयांची मने हादरली. भावाच्या सुटकेसाठी सरबजीतची बहीण दलबीर कौरने देशात आणि सीमेपार जाऊन अथक प्रयत्न केले होते. भारत-पाकिस्तान संबंधांदरम्यान हिंदोळे घेणाऱ्या जिवांची घालमेल चित्रित करणारा ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ ऑस्करला जाण्याची शक्यता आहे.
सरबजीत सिंग यांनी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. तिथे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या तुरुंगात सरबजीतचा अतोनात छळ केला जातो. लाहोरचे एक वकील ओवेसी शेख या खटल्यात मदतीसाठी पुढे येतात. पाकिस्तान सरकारच्या वतीने सरबजीतच्या फाशीची तारीख टाळली जाते. त्यामुळे सरबजीतच्या सुटकेची आशा वाढते. परंतु, ही आशा फोल ठरते. एके दिवशी तुरुंगातील कैदी सरबजीतला बेदम मारहाण करतात. यात त्याचा रुग्णालयात मृत्यू होतो असे सरबजीतचे कथानक आहे.
या चित्रपटात सरबजीत सिंहच्या भुमिकेत रणदीप हुड्डा, त्याची मोठी बहीण दलबीर कौरच्या भुमिकेत ऐश्वर्या राय आणि पत्नीच्या भुमिकेत ऋचा चढ्ढा आणि पाकिस्तानी वकिलच्या भुमिकेत दर्शनकुमारने यांनी आपल्या भूमिकेत छाप पाडली आहे.
संवेदना हा ‘सरबजीत’ चित्रपटाचा गाभा आहे. भारत-पाकिस्तान संबंध, अजाणतेपणी सीमा पार करणारे लोक, तुरुंगात डांबण्यात आलेल्या निर्दोष लोकांचे दु:ख, स्वकीयांच्या परतीची वाट पाहणाऱ्या कुटुंबांची घालमेल आणि भावाच्या सुटकेसाठी बहिणीचा अथक संघर्ष, असे हे भावोत्कट कथानक आहे.