पारसिक बोगद्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर पारसिक डोंगराच्या कुशीत कळवा आणि मुंब्रा भागात राहणारे नागरिक मृत्यूच्या दाढेत वास्तव्य करत आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पारसिक डोंगर हा भूकंपप्रवण भाग असून त्यात मागील काही वर्षात या भागात वाढलेली अतिक्रमणे आणि त्यामुळे डोंगरावर पडलेला भार पाहता कधीही दरड कोसळू शकते. त्यामुळे या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.
कळवा भागातील आतकोनेश्वर नगर, पौंड पाडा, शिवशक्ती नगर, घोलाई नगर, वाघोबा नगर, भास्कर नगर या भागात दरड कोसळण्याची किंवा भूस्खलनाची दाट शक्यता आहे. तर मुंब्रा भागातील आझाद नगर, गावदेवी मंदिर परिसर, केणी नगर, सनिक नगर, कैलास नगर अशा भागांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
या भागांचा समावेश खुद्द ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपल्या धोकादायक ठिकाणांच्या यादीत केला आहे. हे सर्व भाग तीव्र डोंगर उतारांवर वसलेले असून तिथे आज मोठया संख्येने नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे तिथे दरड कोसळली किंवा भूस्खलन झाले, तर शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी जातील.
मुंब्रा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना कमी-अधिक प्रमाणात घडत आलेल्या आहेत. त्यात यंदा तर थेट पारसिक बोगद्याच्या वरच्या भागात असलेल्या आरसीसी संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे या भिंतीवर आणि या डोंगरावर किती ताण येत असेल याची कल्पना करता येऊ शकेल.