बॅटरीचोर रेल्वेतीलच?

माहीम येथील पश्चिम रेल्वेच्या विद्युत उपकेंद्रातून एक-दोन नाही, तर १८ बॅटरी चोरीला गेल्यामुळे सोमवारी पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलडमल्यानंतर आता या बॅटरी चोरीमागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध सुरू झाला आहे. गर्दुल्ले किंवा भुरटे चोर एवढा धोका पत्करून अवजड वस्तू चोरत नाहीत. त्यामुळे हे रेल्वेतील कोणाचे तरी काम असावे, असा संशयही आता व्यक्त होत आहे.

तसेच याच उपकेंद्रातून दीड महिन्यापूर्वी पश्चिम रेल्वेच्याच ५२ बॅटरी चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पश्चिम रेल्वेने शाहू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माहीम येथे हार्बर आणि पश्चिम अशा दोन मार्गाच्या मार्गिका आहेत. माटुंगा रोडच्या दिशेला हार्बर आणि पश्चिम रेल्वेचे मार्ग वेगळे होतात, त्या ठिकाणी विद्युत उपकेंद्र आहे. या विद्युत उपकेंद्रात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या केबिन आहेत. या केबिनमध्ये बॅटरी ठेवल्या आहेत. सोमवारी याच केबिनमधील १८ बॅटरी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.  सहा व्ॉट एवढी शक्ती असलेल्या एका बॅटरीचे वजन ३० किलो एवढे आहे.

त्यामुळे या १८ बॅटरी चोरण्यासाठी चोराने रेल्वे वसाहतीतून या उपकेंद्रात येणाऱ्या रस्त्यावरून एखादा ट्रक किंवा गाडी आणली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे याच उपकेंद्रातून २ मे रोजी ५२ बॅटऱ्यांची चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतरही पश्चिम रेल्वेने रेल्वे सुरक्षा दलाकडे येथे सुरक्षा देण्याबद्दल कोणतेही पत्र दिलेले नाही. तसेच विद्युत विभागाने येथे खासगी सुरक्षारक्षक तैनात करणे गरजेचे असताना, तशी कार्यवाही केली गेली नाही. रेल्वे सुरक्षा दलातील काही अधिकाऱ्यांच्या मते हे रेल्वेतील कोणाचे तरी काम असण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या केबिनमधूनही सोमवारी ५० पेक्षा जास्त बॅटरी चोरीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत मध्य रेल्वेकडे विचारणा केली असता, तसे काहीही घडले नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *