अकरावी आॅनलाइन प्रवेशाची मुदत संपली

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली अकरावी आॅनलाइन प्रवेशाची मुदत शुक्रवारी रात्री १२ वाजता संपली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत २ लाख १६ हजार १४९ विद्यार्थ्यांनी अर्ज कन्फर्म केल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. तरी विद्यार्थ्यांना आता कट आॅफची चिंता लागली आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी अकरावी आॅनलाइनसाठी एकूण २ लाख ६४९ अर्ज दाखल झाले होते. त्या तुलनेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत कन्फर्म झालेल्या अर्जांची संख्या २ लाख १६ हजार १४९ होती. तर १ हजार १२२ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरून कन्फर्म केलेले नव्हते आणि २ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. त्यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण अर्ज भरून तो कन्फर्म केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एकंदरीत प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या टक्क्यात मात्र यंदा एका टक्क्याची घट झाली आहे.

दुसरीकडे ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’ आणि ‘आयजीसीएसई’ या केंद्रीय मंडळाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नामवंत महाविद्यालयांतील मोक्याच्या जागा पटकवण्यासाठी चांगली चुरस पाहायला मिळेल.

बोर्ड पसंतीक्रम अर्ज

एसएससी २,००,५३९

सीबीएसई ५,४७०

आयसीएसई ८,३९३

आयबी ३

आयजीसीएसई ७३१

एनआयओएस ३२४

इतर ६८९

एकूण २,१६,१४९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *