ठाणे : मित्रांबरोबर बाहेर जाऊ नकोस, विनाकारण फिरू नकोस असा वडिलांनी सल्ला दिल्याने रागाच्या भरात एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. शिवशाही कदम असे या तरुणाचे नाव असून हा उल्हासनगर येथील अण्णा भाऊ साठे नगर येथे राहत होता. वडिलांच्या बोलण्याच्या रागाने या तरुणाने घराजवळ असलेल्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवशाही कदम याचा खुच्र्या दुरुस्त करण्याचा व्यवसाय होता. शनिवारी वडील त्याला रागावले. याचा राग आल्याने त्याने घराजवळच्या झाडाला गळफास घेतला. वडिलांना आणि शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.