उजनी धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रात सुमारे दीड तास झालेल्या दमदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.
या दमदार पावसामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाणलोट क्षेत्राच्या विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. तीव्र उन्हाळा काळ सहन केल्यानंतर जूनच्या सुरुवातीपासून पावसाचे आगमन झाल्याने पाणलोट क्षेत्रातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कालठण, कळाशी, अगोती, गंगावळण, करेवाडी परिसरात झालेला पाऊस शेतकरी वर्गाला सुखावणारा आहे.
या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी पाणलोट क्षेत्रात येणार्या या परिसरातील शेतकर्यांना आपल्या शेतातील पिके वाचवण्यासाठी विविध संकटांचा सामना करावा लागला होता. उन्हाळ्याची चाहूल लागताच या परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यावेळी आंदोलने झाल्यानंतर किमान पाच तासांचा निर्णय झाला, पण दरम्यानच्या काळात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तरीही शेतकर्यांनी उपलब्ध पाण्याचा व विजेचा योग्य वापर करून पिके वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
उजनी धरणातील पाणीपातळीत मोठी घट झाल्याने शेतीला पाणीपुरवठा करणे कठीण बनले होते. यावेळी सर्वांचे लक्ष वरुणराजाच्या आगमनाकडे लागेल होते. अशा वेळी पावसाचे झालेले आगमन सुखावणारे ठरले आहे.