विजेच्या धक्क्याने युवक ठार

माधवनगर येथे तळघरात साचलेले पाणी मोटारीने काढत असताना विजेचा धक्का लागून एक युवक ठार झाला. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. कुमार शंकर पुजारी (वय 27, रा. लक्ष्मीनगर, माधवनगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, सांगलीतही  गुरुवारी रात्री जोरदार पावसामुळे नळभागात घराची भिंत कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जखमी झाले.

गुरुवारी रात्री सातपासून सांगली शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. माधवनगर येथील रविवार पेठेत राजाराम प्लाझा या इमारतीसमोर कुमार पुजारी याचा हातगाडा आहे. या इमारतीतील तळघरातील गाळाही त्याने भाड्याने घेतला आहे. पावसामुळे या गाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यावेळी हातगाड्यावर असल्याने पूर्णपणे भिजला होता. तळघरातील पाणी

काढण्यासाठी त्याने मोटार लावली. ओल्या हातानेच मोटारीची पिन लावून बटन सुरू करताना त्याला एकदम जोराचा वीजेचा धक्का बसला. त्यातच तो तेथेच कोसळला. इतरांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. धक्का बसलेल्या हाताचे एक बोट पूर्णपणे जळाले होते. उच्च दाबाचा धक्का बसल्याने हृदयक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.

दरम्यान काल रात्री सांगलीत झालेल्या जोरदार पावसाने नळभागातील एका घराची भिंत कोसळली. यामध्ये सोलिया जमीर मुल्ला (वय 9), साहिबबी महम्मदहुसेन मुजावर (वय 70), इर्शाद महम्मदहुसेन मुजावर, रिजवान इर्शाद मुजावर (वय 35) जखमी झाले आहेत. यात सोलियाचा पाय मोडला असून अन्य जखमींच्या डोके, हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व जखमींवर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *