महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी गटार-नाले सफाईचे कितीही खुलासे दिले आणि गुंठेवारी भागात कामे केल्याचे सांगत कितीही छाती बडवली तरी पहिल्याच पावसाने ही सारी नाटके उघडी पडली आहेत. एकाच पावसाने सांगली शहर आणि गुंठेवारी भागाची दाणादाण उडवलीच, पण त्यानंतर आज दुसरा दिवसही रस्त्यावर – घरावर कोसळलेली झाडे आणि पडलेले विजेचे खांब धड करता करता यंत्रणेच्या नाकीनऊ आले.
गुरुवारी संध्याकाळी जोरदार पावसाने सांगलीला पार धुवून काढले. गावभाग, पेठभाग, खणभाग, सराफ कट्टा, गणपती पेठ, हरभट रोड, राजवाडा चौक, कॉलेज कोपरा, विश्रामबाग परिसर या भागाची जिथे पावसाने वाट लावली तिथे गुंठेवारी भागात काय अवस्था झाली असेल ते पहाण्यात आज यंत्रणेचा दिवस गेला.
गुंठेवारीसह मुख्य चौकांमध्येही सांडपाणी तुंबून तळी साचली. शहरातील मुख्य रस्ते व चौकांमध्ये 12 मोठी झाडे कोसळल्याची माहिती पालिका यंत्रणा देत असली तरी त्याची संख्या किती तरी मोठी आहे. सुदैवानेच जीवित हानी झाली नाही. पण यानंतर आता शहरातील जुन्या आणि धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारे आणि नाले सफाई करुन पावसाच्या पाण्याला वाट करुन दिल्याचा बडेजावपणा महापालिका यंत्रणेने यंदाही मारला होता. पण पहिल्याच पावसात स्टेशन चौक, राममंदिर चौक, झुलेलाल चौक, हरभट रोड, सिव्हिल चौकात पाणी कसे साचले? शिवाजी मंडई पाण्यावर कशी तरंगायला लागली? मारुती रोडवर पुन्हा गुडघाभर पाणी कसे काय उभे राहिले? आणि गुंठेवारी भागातल्या घरांतून पाणी कसे काय शिरले या सवालांचा कसला खुलासा पालिका करणार आहे, का असा सवाल नागरिक करत आहेत.
आपटा पोलिस चौकी, स्टेशन चौक, आझाद चौक, मराठा समाज भवनसमोर, गणपती मंदिर, राममंदिर चौक, देशपांडे उद्यान, मगरमच्छ कॉलनी, शेरीनाला पंप हाऊस या भागात भली दांडगी झाडे कोसळली. झालेल्या नुकसानीची जबाबदारी वृक्ष विभाग घेणार का? असा आता सवाल केला जातो आहे.
वीज पुरवठा यंत्रणेला सर्वाधिक फ टका
शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले. विद्युतारा तुटून रस्त्यावर पडल्या. विजेच्या खांबांची ही अवस्था असेल तर बाकीच्या बाबींचे काय? आज दुसर्या दिवशीही दिवसभर शहरातील बर्याच भागात वीज पुरवठा खंडितच होता आणि जिथे होता तिथे तो कमी दाबाचा होता.