उन्हाने शरीराची लाहीलाही होत असल्याने बच्चे कंपनी पाण्यात पोहोण्याचा आनंद घेत असतात. मात्र ही मजा जीवाशी बेतल्याचा प्रत्यय आला. खोपोलीत पाताळगंगेचा उगम होत असलेल्या ठिकाणी बंधारा आहे. या ठिकाणी बच्चे कंपनी नेहमीच पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी जात असतात. बुधवारी शीळफाटा यशवंतनगर येथील पाच लहान मुले घरच्यांच्या नकळत दुपारच्या दरम्यान पोहोण्यासाठी गेले असता पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्याने यातील तीन जन पोहोण्याचा आनंद लुटत असताना एक जण पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहत गेल्याने त्याला जीव गमवावा लागला. तर दोन जणांना मित्रांच्या मदतीने नदीच्या बाहेर काढण्यात यश आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवार, १ जून रोजी खोपोली शीळफाटा येथील यशवंत नगर येथील सातवी ते दहावीमधील पाच मुले घरातील मंडळींची नजर चुकवून खोपोली शहराच्या पाताळ गंगा नदीच्या उगमापाशी गगनगिरी मठाजवळ असणाऱ्या बंदाऱ्याजवळ पोहोण्यासाठी गेले असता या ठिकाणी नदीच्या पात्रात तीन लहान मुले उतरली. त्यांना खोलगट भागाचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात अडकले. यातील दोन जणांना पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना बाहेर असणाऱ्या मुलांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना एका मुलाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र आकाश रिवद्रनाथ मिश्रा (रा.यशवंत नगर शीळफाटा, वय १२) हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची खोपोली पोलीस ठाण्यात मुलांनी माहिती दिल्याने खोपोली पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी पाताळ गंगा नदीचे पात्रात शोध घेतला. तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर आकाशचा मृत्यूदेह खोपोलीच्या पेप्को कारखान्याजवळील पाण्याच्या प्रवाहात आढळला. त्याला बाहेर काढून खोपोली रुग्णालयात आणले असता आकाशला पाहून त्याचे वडील व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. पोहोण्याचा मोह आवरता आला नसल्याने या मुलाला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र दुख:चे सावट पसरले आहे.