विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा असतानाच भारतीय जनता पक्षाने ७ उमेदवारांचे अर्ज दाखल करून ही निवडणूक होईल की दोन उमेदवारांची माघार होईल याचा संभ्रम निर्माण केला आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपातर्फे विनायक मेटे, सदाभाऊ खोत, प्रविण दरेकर, आ. एन. सिंह, सुरजीतसिंग ठाकूर हे भाजपाचे पहिल्या पसंतीचे ५ उमेदवार आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे पक्ष फिरून झालेले प्रसाद लाड यांना भाजपाच्या १० उमेदवारांचे समर्थन देवून सहावा उमेदवार म्हणून पसंती देण्यात आली आहे. सातवा उमेदवार म्हणून भाजपामधील अपक्ष आमदारांच्या सह्या घेवून मनोज कोटक यांनी भाजपाने अपक्ष आमदार म्हणून उभे केले आहे.
शिवसेनेतर्फे दिवाकर रावते, सुभाष देसाई, काँग्रेसतर्फे नारायण राणे, राष्ट्रवादीतर्फे रामराजे निंबाळकर आणि धनंजय मुडे असे १० जागांसाठी आता १२ उमेदवार आहेत.
३ जूनला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे अशी राजकीय शक्यता व्यक्त केली जात आहे की, अपक्ष मनोज कोटक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल. तरीसुध्दा १० जागा आणि ११ उमेदवार अशी स्थिती राहील्यास निवडणूक अटळ आहे. मात्र भाजपाचा हा सहावा उमेदवार का लढवित आहे आणि कोणासाठी? भाजपाकडे भाजपाची १२३ मते असून अपक्ष २० धरून १४३ मतांचा कोटा आहे. त्या कोटय़ात भाजपाचे ५ उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येवू शकतात. भाजपाच्या ६ व्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पहिल्या पसंतीची फक्त ८ मते आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा अशी आहे की, भाजपाने हा उमेदवार कोणासाठी उभा केला आहे.