खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राची पाणीयोजनाच ग्रामस्थांनी पळवली

कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागातील खांडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राची नळपाणी योजना पाणीटंचाईग्रस्त खांडस ग्रामस्थांनी यांनी सहा महिन्यापूर्वी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पाणी विकत घ्यावे लागत आहे. परंतु नळपाणी योजनेचे ८५ हजार रुपयांचे बिलमात्र, आरोग्य विभागाच्या नावेच थकीत राहिले आहे.

खांडस येथे रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा सरकारी दवाखाना आहे. संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या खांडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नळपाणी पुरवठा योजना आहे. कर्जत पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे विभागाने केंद्रातील रुग्ण व कर्मचा-यांसाठी २०१२ मध्ये ही योजना नळपाणीपुरवठा योजना सुरू केली होती.

मात्र, खांडस भागात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे आरोग्य केंद्रासाठीचे पाणी ग्रामस्थांकडूनच नेले जात आहे. मागील वर्षीही पाणी ग्रामस्थांकडून नेले जात होते. त्याचे जेमतेम बिल २ हजार रुपये आरोग्य केंद्राला येत होते. मात्र, आता खांडस ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जलवाहिन्याच उखडून टाकल्या आहेत.

या जलवाहिन्या गावातील तीन विहिरींना जोडून आरोग्य केंद्राच्या नळपाणीयोजनेचे पाणी थेट वळवून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात पाणी नाही. त्यामुळे केंद्राला पाणी विकत घ्यावे लागत आहे. केवळ पाणी आणण्यसाठी केंद्रात एका महिलेला काम देण्यात आले आहे.

लघु पाटबंधारे विभागाने खास बाब म्हणून मंजूर केलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची नळपाणी योजना कोणतीही परवानगी न घेता पळवली गेली आहे. मागील डिसेंबर पासून वापरात असलेले पाणी विजेच्या पंपाच्या साहाय्याने उचलत असतांना आरोग्य केंद्राला विजेचे बिल भरमसाट आले आहे.

खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावे असलेल्या विजेच्या जोडणीचे बिल तब्बल ८५ हजार रुपये आले आहे. गेली अनेक महिने प्राथमिक आरोग्य केंद्र पाणी वापरात नसल्याने त्या ८५ हजार रुपयांचे बिल भरणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *