पान, गुटख्याने रेल्वेच्या भिंती रंगवाल तर याद राखा!

‘स्वच्छ भारत अभियाना’चा गाजावाजा देशभर सुरू असला तरी मुंबईच्या रेल्वे स्थानकातील भिंती पान आणि गुटख्याच्या पिचका-यांनी रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे अस्वच्छता पसरवणा-या प्रवाशांना जरब बसवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्टेशन मास्तरांना एक टार्गेट आखून दिले आहे. त्यानुसार स्टेशन परिसरात पान व गुटख्याच्या पिचका-या तसेच कचरा टाकताना दिस-यास यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानक परिसरात अनेक जण पान व गुटखा खाऊन थुंकताना दिसतात. याच पानांच्या पिचका-यांनी स्टेशन परिसरातील कोप-यांसह अनेक ठिकाणी स्थानकांचे विद्रुपीकरण केले जात आहे. पान आणि गुटखा खाऊन थुंकणा-यांसहित स्थानक परिसरात कचरा फेकणा-यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता करणा-यांविरोधात कारवाईचे आदेश (आरपीएफ) रेल्वे सुरक्षा बलाला देण्यात आले होते. मात्र आता रेल्वे स्थानकांची जबाबदारी असलेल्या स्टेशनमास्तरांनाही हे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार रेल्वे परिसरात घाण करणा-यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेशन परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल, असा दावा पश्चिम रेल्वेकडून केला जात आहे.

ही खास जबाबदारी देताना या कारवाईत स्टेशनमास्तरांना दर दिवसाचे टार्गेटही देण्यात आले आहे. त्यानुसार थुंकणा-या व स्टेशन परिसरात घाण करणा-यांवर रेल्वे कायदा कलम १९८ अनुसार नियम मोडणा-या प्रवाशांवर दंड ठोठावण्याचे अधिकार स्टेशनमास्तरांना देण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी सर्व स्टेशन मास्तरांना कारवाईसंदर्भात दैनंदिन टार्गेटही आखून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *