लष्कराच्या वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला सोमवारी रात्री उशिरा अचानक आग लागून झालेल्या भीषण स्फोटांमध्ये २० जवानांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये लेफ्ट. कर्नल आर. एस. पवार आणि मेजर के. मनोज या अधिका-यांचा समावेश आहे. ही आग विझवताना अग्निशमन विभागातील १३ जवानांना प्राण गमावावे लागले. या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. वाढत्या अतिरेकी कारवाया पाहता, या आगीमागे घातपाताची शक्यता बोलून दाखवली जात आहे. लष्कराने या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिले आहेत.
पुलगाव येते लष्कराचा देशातील सर्वात मोठा दारुगोळा डेपो २८ किलोमिटर परिसरात पसरला आहे. आयुध निमार्णी कारखान्यांमध्ये तयार होणारी शस्त्रे आणि दारुगोळा आधी या भांडारात येतो. यानंतर आवश्यकतेप्रमाणे वितरीत केला जातो. सोमवारी रात्री एक ते दोनमध्ये कानठळ्या बसणा-या आवाजांनी सभोवतालच्या गावातील लोक जागे झाले. कित्येक किलोमीटरवरून आगीचे लोट दिसत होते. सोमवारी मध्यरात्री भांडारातून धूर येत असल्याचे अधिका-यांना दिसले. दोन अधिकारी आणि काही जवान तेथे पाहणीसाठी गेले. भांडाराचा दरवाजा उघडताच दोन बॉम्बचे स्फोट झाले त्यानंतर एकच हल्लकल्लोळ उडाला. या स्फोटांची तीव्रता एव्हढी भयंकर होती की, १५ किलोमीटरच्या परिसरातील ८ ते १० गावांना स्फोटांचे हादरे बसले. काही घरांच्या भिंती कोसळल्या. भीतीने लोक गाव सोडून पळाले. कित्येक तास उलटूनही, अधूनमधून स्फोटांचे आवाज येत असल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
यात पूर्ण दारुगोळा भस्मसात झाल्याची भीती आहे. सुमारे ३ हजार कर्मचारी व सैनिक येथे असतात. या संवेदनशील क्षेत्रात झालेल्या या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुख व्यक्त केले आहे. त्यांच्या सूचनेनुसार संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी दुपारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सोबत लष्करप्रमुख दलबीर सिंग ही होते. रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींशी विचारपूस केली. या दुर्घटनेचा अहवाल आपण लष्कराकडून मागवल्याचे र्पीकर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आग आटोक्यात आणण्यात यश आले असून सरकार सर्वतोपरी मदत करीत आहे. आगीची तीव्रता पाहून शेजारच्या दोन गावातील नागरिकांना रात्रीच सुरक्षितस्थळी हलवले होते.