देशातील औद्योगिक उत्पादन थंडावलेले असताना आंध्र प्रदेशातील मंदिरांच्या उत्पन्नामध्ये जवळपास २७ टक्के घशघशीत वाढ झाली आहे. ‘समाजात पाप वाढत आहे, त्यातून मुक्त होण्यासाठी नागरिक देवदर्शन करून मंदिरांना पैसा देत आहेत, असे खळबळजनक विधान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले.
येथे आयोजित केलेल्या जिल्हाधिका-यांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, देशात औद्योगिक मंदी असून उत्पादन थंडावले आहे. मालाला उठाव नाही. या परिस्थितीत मंदिरांचे उत्पन्न भरघोस वाढत आहे. वाढत्या पापापासून मुक्त होण्यासाठी नागरिक देवळात जाऊन पैसे टाकत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंध्रात दारूचा खप मोठया प्रमाणात घटला आहे. त्यामुळे राज्याचे उत्पन्नही कमी झाले आहे. आंध्र प्रदेशातील बहुतांशी नागरिकांनी अय्यप्पा स्वामींची दीक्षा घेतली आहे. हे सर्व भक्त ४० दिवस दारू पीत नाहीत. त्यामुळे दारू विक्री कमी झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. आंध्र प्रदेश हे नवीन राज्य अवघे दोन वर्षाचे आहे.
२०२२ पर्यंत देशातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये तर २०२९ मध्ये पहिल्या क्रमांकावर हे राज्य असायला हवे हे ध्येय आम्ही ठेवले आहे. आम्ही ‘व्हिजन-२०५०’ आखले असून गुंतवणुकीच्या बाबतीत आम्हाला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे. त्यासाठी जबाबदारी घेऊन प्रशासनाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.