नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठावर मंगळवारी सीबीआयने छापे मारले. या विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी गैरव्यवहार केल्याचे उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानंतर तपास संस्थेने सात ठिकाणी छापे मारून झाडाझडती सुरू केली. विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला नाही. या प्रकरणी विद्यापीठाचे कुलगुरू सुशांत दत्तागुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दत्तागुप्ता यांच्या राजवटीत मोठया प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर यंदाच्या फेब्रुवारीत दत्तागुप्ता यांची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पदावरून हकालपट्टी केली होती. विद्यापीठात आर्थिक व प्रशासकीय पातळीवर बजबजपुरी माजल्याचा अहवाल गृहखात्याने राष्ट्रपतींना सादर केला होता.
दत्तागुप्ता हे विश्वभारती विद्यापीठातून वेतन घेत होते तर जेएनयू विद्यापीठातून त्याचवेळी पेन्शन घेत होते. कायद्यानुसार, विश्वभारतीकडून मिळणा-या पगारातून पेन्शनची रक्कम रद्द करणे आवश्यक होते. तसेच दत्तागुप्ता यांनी विद्यापीठात विविध पदे भरताना गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. तसेच विश्वभारती कायद्याचा भंग करून महत्त्वाची पदे भरण्यात आली.
विशेषकरून विद्यापीठाच्या उप रजिस्ट्रार श्यामला रे नायर यांची नेमणूक करताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करण्यात आल्याचे उघड झाले. दत्तागुप्ता यांची २०११ मध्ये विश्वभारती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली होती.