एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही

एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही

यंदाचा निकाल विक्रमी असून राज्यातील विद्यार्थ्यांची एकूण प्रवेश क्षमता लक्षात घेत एकही विद्यार्थी यंदा प्रवेशापासून वंचित राहणार नाही,’ असे प्रतिपादन शिक्षणमंत्री ​विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

दहावी बोर्डाच्या विक्रमी निकालाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी तावडे यांनी नापास विद्यार्थ्यांची जूनमध्ये फेरपरीक्षा घेण्यासंदर्भातील निर्णय पुढील वर्षीपासून लागू करण्याची घोषणाही केली.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा देताना त्यांनी ‘शालेय परीक्षेत यश मिळाले नाही म्हणून खचून जाण्याची गरज नाही. या परीक्षेवर जीवनातील यशापयश अवलंबून नसते, अपयशी विद्यार्थ्यांनी निराश न होता अंगभूत कौशल्य ओळखून पालकांच्या मदतीने पुढील दिशा ठरवावी,’ असा दिलासा दिला.

राज्यात एकूण १४ लाख ३७ हजार ९२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी १५ लाख ६८ हजार ६६४ जागा उपलब्ध आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षेत केवळ आठ टक्के विद्यार्थी नापास झाले असून या विद्यार्थ्यांसाठी संबधित शाळांनी करिअर विषयक उपक्रम राबवावेत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढची दिशा ठरविता येईल, असे तावडे यांनी सांगितले. तर सीबीएसई आणि आसीएसई मंडळाने यासंदर्भात कोणता निर्णय घ्यावा, हे त्या मंडळांवर अवलंबून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

योग दिन; सक्ती नाही

‘२१ जून रोजी साजरा होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यासाठी कोणत्याही शाळांवर करण्याची सक्ती केलेली नाही. तसेच योग दिनासाठी कुठलीही फी अथवा शुल्क घेण्याचे काढलेले नाही,’ असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *