राज्यातील दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रकल्पातील वीजनिर्मितीचे काम येत्या १५ जूनपासून सुरू केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा, कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. वीजनिर्मितीसाठी आवश्यक असणा-या गॅसची उपलब्धता केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.
ही वीज भारतीय रेल्वेकडून खरेदी करण्याची सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. येत्या काही दिवसात आरजीपीपीएल आणि भारतीय रेल्वेमध्ये वीज खरेदीचा करार होईल, असे ते म्हणाले. गॅसच्या कमतरतेमुळे गेली अनेक वर्षे आरजीपीपीएल प्रकल्प बंद होता. देशातील विजेची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत.
या प्रकल्पासाठी आवश्यक १.९८ एमएमएस इतका गॅसची उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १५ जूनपासून या प्रकल्पातून वीजनिर्मितीचे काम सुरू होईल. रविवारी रत्नागिरीच्या दौ-यात केंद्रीय ऊर्जामंत्री गोयल यांनी या प्रकल्पाला भेट दिली. हा प्रकल्प सक्षमरित्या उभा राहण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. वीज निर्मितीचा प्रकल्प योग्यरितीने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, गॅस अॅथॉरीटी तसेच राज्य सरकार अशा चार भागभांडवलधारकांशी चर्चा करून त्याबाबत योग्य ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरजीपीपीएलला केंद्र सरकारने पाठींबा देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. वीज निर्मितीतून आता ४.७० रूपयापर्यंत वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी गॅस प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती त्यादृष्टीने फायदेशीर ठरणारी आहे. कोल इंडियाने कोळशाच्या उत्पादनातही वाढ केली आहे. यापूर्वी चार वर्षामध्ये ३१ मिलीयन टन कोळसा उत्पादीत केला जात होता. आता वर्षभरात त्यात ११.०९ टक्के वाढ झाली असून, ३२ दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादन घेतले जात असल्याचेही गोयल यांनी सांगितले. वितरण व्यवस्थेतील गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असून तीन वर्षात नॅशनल ग्रीड मजबूत करताना मागणीनुसार वीज उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छ विजेसाठी अणुऊर्जा उपयुक्त
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी स्वच्छ विजेकरीता अणुऊर्जा उपयुक्त ठरू शकणारी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात व्यक्त केली. या प्रतिक्रियेतून गोयल यांनी जैतापूर येथील नियोजित अणुऊर्जा प्रकल्प होण्याचे संकेत दिले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखत असताना प्रदूषणविरहित ऊर्जानिर्मितीच्यादृष्टीने अणुऊर्जा एक चांगला पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकल्प उभारताना आवश्यक सुरक्षिततेचीही काळजी घेण्याचे काम केले जाईल, असे स्पष्ट करत असतानाच या प्रकल्पाच्या अनुषंगाने जे प्रश्न उपस्थित केले जात असतील, त्या प्रश्नांचे योग्यरितीने निरसन केले जाईल, असेही सांगितले.