राज्यात गेल्या काही दिवसापासून पावासाची तुफान बॅटिंग सुरु आहे. अशातच मुंबईसह उपनगरात मात्र मुसळधार पावसाचा रुद्ररुप बघायला मिळालं आहे. मुंबई आणि परिसराला रविवारी, सलग दुसऱ्या दिवशी, मुसळधार पावसाने झोडपून काढले. मानखुर्द येथे एका चाळीतील तीन मजली घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे या घटनेत 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पावसात झाडे कोसळण्याच्या घटनांचं सत्र सुरूच असून कुर्ला आणि गोरेगाव येथे दोघांचा झाडांच्या फांद्या कोसळून मृत्यू झाला. तर नवी मुंबई आणि पनवेल येथे अतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये चार जण ठार झाले. अशातच आज सोमवारी देखील पावसाचा कहर कायम राहणार असून हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यात काय परस्थिती?
मुंबईप्रमाणेच कोकणात देखील मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळत आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागानं आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. परिणामी, कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
तर हवामान विभागाने आज सोमवारी पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पुणे शहरातील शाळांना महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी जाहीर केली. नाशिक जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’चा अंदाज आहे. तसेच घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर हवामान विभागाने आज सोमवारी पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पुणे शहरातील शाळांना महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी जाहीर केली. नाशिक जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’चा अंदाज आहे. तसेच घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात जोरदार पावसामुळे वाहनांच्या गतीवर परिणाम झाला आहे. आज सोमवार असल्यानं आठवड्याचा पहिलाच कार्यालयीन दिवस आहे. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची माहिती तपासून पुरेसा वेळ हाताशी ठेवावा, तसेच अत्यावश्यक काम असल्यासच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबईची लाईफलाईन उशिराने
मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल रेल्वेचे वेळापत्रक काही प्रमाणात कोलमडलं आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. वसई, नालासोपारा आणि विक्रोळी परिसरात रुळांवर पाणी साचल्यामुळे काही लोकल धीम्या गतीने चालवण्यात येत आहेत. कर्जत-लोणावळ्यादरम्यान घाटात दरड कोसळल्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेच्या स्थितीची खात्री करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीपेक्षा कितीतरी पट अधिक पाऊस झाला आहे. अशातच मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटवर एक मोठा स्लॅब कोसळला आहे. हा स्लॅब कोसळून छताच्या भागातून डोंगरावरील राडारोडा खाली पडत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्णपणे बंद नसली तरी अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना आज सोमवारी मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावाच, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
