राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं असून पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आषाढी वारीलाही पावसाचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला येणाऱ्या नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. “इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये,” असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
वारकरी, भाविक व नागरिकांना आवाहन करताना प्रशासनाने म्हटलं आहे की, “कृपया पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं. अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणं टाळावं. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून सहकार्य करावं, ही नम्र विनंती.”
