महाराष्ट्राचे तुकडे करू देणार नाही’

महाराष्ट्राचे तुकडे करू देणार नाही’

‘संयुक्त महाराष्ट्राचा लढ्याचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे माझ्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सध्या कोणाला खुमखुमी आलेली आहे. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ. महाराष्ट्र तोडणे कोणालाही शक्य होणार नाही. हुतात्म्यांना साक्षी ठेऊन आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या कार्यक्रमातून आपण हा संदेश देत आहोत की, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पहाल तर जशास तसे उत्तर देऊ’, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी शनिवारी येथे खणखणीत शब्दांत दिला.

‘स्वाभिमान’ संघटनेतर्फे आयोजित केलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या सत्कार कार्यक्रमात आमदार नितेश राणे बोलत होते. नवीन पिढीला चांगल्या मार्गाने घेऊन जायचे असेल तर इतिहास समजून घ्यायला पाहिजे, तो जपला पाहिजे आणि घडवला पाहिजे. हा संदेश तरुणांपर्यंत जाण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या महाराष्ट्राला विभक्त करण्याची, तुकडे करण्याची जी वक्तव्ये केली जात आहेत ती पाहता, अशी वक्तव्ये करणा-यांना त्याचवेळी रोखणे, त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आताच्या पिढीचा इतिहासाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी, आज आपण ज्यांच्यामुळे सुरक्षित जीवन जगत ताठ मानेने बसलेलो आहोत त्या हुतात्म्यांची, राज्यासाठी प्राण दिलेल्या कामगारांची, शेतक-यांची जाणीव करून देण्यासाठी आज या कार्यक्रमाचे आयोजन करावे लागत आहे. तरूण हे धगधगत्या आगीसारखे असतात. या आगीचा वापर चूल पेटवण्यासाठीही केला जाऊ शकतो आणि घर उध्वस्त करण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे तरूणाईला अभ्यासाच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. केवळ या सभागृहापुरती ही जाणीव मनात न ठेवता, सभागृहाबाहेर पडल्यावर अखंड महाराष्ट्राची मशाल मनात धगधगती ठेवणे ही माझी जबाबदारी आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे मुख्य उद्दीष्ट आहे. याची जाणीव आमच्या मनामध्ये निर्माण करण्याचे श्रेय मी माझ्या वडीलांना देतो. अखंड महाराष्ट्राच्या लढय़ाची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे विधीमंडळातील अडीच तास चालणारे भाषण गाजलेले आहे. केवळ इतिहास वाचायचा नाही, तर तो पुढे घेऊन जायचा, ही भावना निर्माण करणे त्यांच्याकडूनच शिकलो असल्याची भावना नितेश राणे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र दिनी एकीकडे हुतात्म्यांचे स्मरण होत असताना दुसरीकडे विदर्भात मात्र श्रीहरी अणे आणि त्यांच्यासोबत काही मोजक्या लोकांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करत काळा दिन साजरा केल्याने राणे यांनी त्यांच्यावरही तोफ डागली. स्वतंत्र विदर्भाची मागणी करत अखंड महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रयत्न काही मोजक्या लोकांद्वारे केले जात आहेत. मात्र हा अपमान खपवून घेतला जाणार नाही. महाराष्ट्रात हिंसावाद करणा-यांना त्यांच्याच भाषेत असे उत्तर देऊ की ते स्वत:चा खटला लढवू शकणार नाही अशी तोफ डागत नितेश राणे यांनी श्रीहरी अणेंना टोला हाणला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे तुकडे करण्याची वक्तव्ये श्रीहरी अणे जरी करत असले तरी त्यांच्यामागे आरएसएस, भाजपाचा हात आहे. मुख्यमंत्री ‘भारत माता की जय’ या घोषणेची जशी सक्ती करतात तशी सक्ती त्यांनी ‘अखंड महाराष्ट्राचा विजय असो’ या घोषणेसाठीही करायला हवी. महाराष्ट्राविषयी असलेले आपले प्रेम दाखवण्यासाठी शिवसेनेचे नेते तोडफोड करतात. मात्र विधीमंडळात चिडीचूप असतात. आमचा संबंध जनतेशी, सत्तेशी नाही, असे वक्तव्य करणा-या शिवसेनेचे प्रेम हे बेगडी आहे हे यावरून दिसून येत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची वार्ता कराल तर याद राखा. वेळ आल्यास राज्याच्या अखंडत्त्वासाठी बलिदान करू, अशी भावना आजच्या तरूणाईने मनात बाळगण्याचे आवाहन नितेश राणे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *