यंदाच्या वर्षात संपूर्ण देशभरातच सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले असतानाच, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या वेधशाळेनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी मॉन्सूनसंदर्भात ही माहिती दिली.
राज्यातील जनता दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना, गेल्या वर्षभरातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. 1972 च्या दुष्काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती, मात्र पाणी उपलब्ध होते. पाण्याची उपलब्धता असल्याने जनतेने तो दुष्काळ परतवून लावला होता. यंदा मात्र पाण्याचीच भीषण टंचाई निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तीन वर्षांपासून हिंदी महासागरात “एल निनो‘ या कमी दाबाच्या
पट्ट्यामुळे देशभरात पावसाने ओढ दिली होती. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. यंदा मात्र हे संकट मावळल्याने चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाच्या पाऊस शंभर टक्क्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या वेधशाळेनेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असल्याची माहिती जैन यांनी दिली. हिंदी महासागरात या वेळी कमालीचे तापमान वाढले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच पावसाला अनुकूल असणारे दमट वातारणही त्यामुळे निर्माण होत असल्याचे दोन्ही देशांच्या वेधशाळेने म्हटले आहे. 2015-16 पासून “एल निनो‘ हळूहळू कमी होत आहे. या काळात दक्षिण गोलार्धात त्याचा वातारणावर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे सागरी प्रदेशात येणाऱ्या देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता जपान व ऑस्ट्रलियाच्या वेधशाळेने वर्तवली आहे.