पुढील वर्षी होणारी आयपीएलची दहावी आवृत्ती परदेशात खेळण्याबाबत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल विचार करत असल्याचे सुतोवाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी केले.
‘‘भारतातील कुठल्या ठिकाणी आयपीएल खेळवता येईल, याची आखणी आम्ही करत आहोत. परदेशात खेळवण्याबाबतही चर्च सुरू आहे. भारतातील ठिकाणे निश्चित करताना त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा अंदाज घेतला जात आहे,’’ असे ठाकूर म्हणाले. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा आयपीएलचे वेळापत्रक कोलमडले आहे. पुढील वर्षीच्या ‘प्लान’विषयी विचारले असता ठाकूर यांनी बीसीसीआयचे म्हणणे मांडले.
मोठा दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई पाहता महाराष्ट्रातील १२ सामने अन्यत्र खेळवावेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला सुनावले आहे. याबाबत विचारले असता, ‘‘सांडपाण्याचा पुनर्वापर केलेले पाणी खेळपट्टी बनवण्यासह मैदानाच्या डागडुजीसाठी वापरावे, अशा सूचना आम्ही राज्य क्रिकेट असोसिएशन्सना केल्या आहेत. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे प्रक्रिया केंद्र सर्वच असोसिएशनकडे नाही. मात्र त्यांनी पिण्याच्या पाण्याचा वापर मैदान आणि खेळपट्टीसाठी करू नये, असे आम्ही त्यांना बजावल्याचे,’’ अनुराग ठाकूर यांनी म्हटले.
दुष्काळग्रस्त राज्यांत आयपीएल सामने न खेळवण्याच्या न्यायालयाच्या निर्देशांनंतर बीसीसीआयचे पदाधिकारी निराश झालेत. अनुराग ठाकूर यांच्यापूर्वी बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी चार दिवसांपूर्वी ‘ट्विटर’वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘हे असेच चालू राहिले तर लवकरच आयपीएल भारताबाहेर जाईल. मात्र त्यामुळे राष्ट्रीय विकास दरात होणारे नुकसान दुर्लक्षित करता येणार नाही,’’ असे चौधरी म्हटले होते.