जगात वाघांची संख्या वाढली असल्याचा दावा अमेरिका, भारत, ब्रिटन व रशिया या देशातील व्याघ्रजीवशास्त्रज्ञांच्या गटाने फेटाळला आहे. दहा वर्षांत वाघांची संख्या दुप्पट होणे केवळ अशक्य आहे असे या गटाचे म्हणणे आहे.
वाईल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. उल्हास कारंथ, रशिया प्रोग्रॅम ऑफ वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटीचे डेल मिक्विली, अमेरिकेतील पँथेरा कार्पोरेशनचे जॉन गुडरीच व ऑक्सफर्ड विद्यापीठाचे अर्जुन गोपालस्वामी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वाघांची संख्या वाढल्याच्या बातम्या आल्या आहेत त्या वैज्ञानिक आधारावर टिकणाऱ्या नाहीत. वाघांची संख्या वाढल्याच्या या बातम्यांमध्ये तथ्य नाही. पाहणीच्या चुकीच्या पद्धती वापरून काढलेले ते निष्कर्ष आहेत त्यामुळे ते योग्य नाहीत. यात यश मिळाल्याचे चित्र उभे केल्याने व्याघ्र संवर्धनाच्या प्रकल्पात ढिलाई येऊ शकते. प्रत्यक्षात परिस्थिती खूप वाईट आहे. आययूसीएनने दिलेले आकडे पाहिले तर वाघांचे ४० टक्के अधिवास नष्ट झाले आहेत. शिकाराचे प्रमाण वाढले आहे. कंबोडिया, व्हिएतनाम, लाओ पीडीआर व चीन या देशात वाघांची संख्या खूप कमी झाली आहे. डब्ल्यू डब्ल्यू एफ व ग्लोबल टायगर फोरम यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार वाघांची संख्या जगात ३ हजार ८९० असल्याचे सांगण्यात आले होते व २०१० मध्ये रशियात झालेल्या व्याघ्र शिखर बैठकीत ही संख्या २०२ सांगण्यात आली होती. भारतात वाघांची संख्या २०१० च्या तुलनेत २०१४ मध्ये ३०.५ टक्के वाढून २ हजार २२६ झाली आहे असा दावा करण्यात आला आहे. जगात दहा वर्षांत वाघांची संख्या दुप्पट होणे अशक्य आहे. या पाहणीत वापरलेल्या पद्धती सदोष असल्याने चुकीचे निष्कर्ष कारण्यात आले आहेत.