भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त बालगंधर्व कलादालनात ‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नोलॉजी’च्या वतीने अनोख्या पद्धतीने म्हणजेच १७६० चौरस मीटरमध्ये २८०७ किलोचा केक तयार करण्यात आला होता. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते हा केक कापून जयंती साजरी करण्यात आली.
पालकमंत्री बापट म्हणाले की, ज्या प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्यार्थीवर्गाने १२५वी जयंती साजरी केली; ती कौतुकाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते यशस्वी झाले. त्यांचा विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
प्रा. धर्मनाद गायकवाड म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात विविध पद्धतीने साजरी केली जात असून; पुण्यात १२५व्या जयंतीनिमित्त २८०७ किलो आणि १७६० चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये केक तयार करण्यात आला. हा केक तयार करण्याकरता १०० तास अपेक्षित धरले होते; मात्र ८८ तासांतच हा केक बनवण्यात आला.
तसेच १२ विद्यार्थी आणि दोन प्राध्यापकांनी मिळून हा केक तयार केला आहे. याची दखल ‘गिनिज बुक’ने घेण्यासाठी देखील प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.