त्या तरुणांच्या दुचाकीचा अपघात झाला.. ते दोघे जखमी झाले.. रक्ताच्या थारोळ्यात ते तब्बल ४५ मिनिटे रस्त्यावर पडून होते. पण कोणीही त्यांना रुग्णालयात नेले नाही, अशी संवेदना हरलेली माणसे पहायला मिळाली ती मुंबईत…
मुंबईतील वडाळा परिसरात दोन तरुण दुचाकीवरून बाहेर निघाले होते. त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांनी रस्त्यावरून ये-जा करणा-या नागरिकांकडे मदतीची याचना केली, पण कोणीही पुढे आले नाही.
रस्त्यालगत गस्त घालणारी मुंबई पोर्ट ट्रस्टची गाडी घटनास्थळावरून जात होती. काही नागरिकांनी त्यांच्याकडे मदत मागितली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली.
तब्बल ४५ मिनिटानंतर काही प्रवाशांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. ते दोघे आता गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करणा-यांची चौकशी करू नये, पोलिसांची वाट न बघता रुग्णांवर उपचार सुरू करावे, असे नियम रस्ते वाहतूक मंत्रालयाने शिथील केले आहेत. तरीदेखील नागरिकांमध्ये याबाबत जागृती झाली नाही.