वातानुकूलित लोकलचा पास खर्चिक

मात्र कोणतीही सवलत नाही; तिकीट दरही चढेच असण्याची शक्यता पुढील काही महिन्यांत मध्य रेल्वेवर नव्याने दाखल होणाऱ्या वातानुकूलित लोकल गाडीमुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार असला, तरी हा प्रवास मुंबईकरांच्या खिशाला मात्र चांगलाच गरम पडण्याची शक्यता आहे. या लोकलचा मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना नेहमीच्या उपनगरीय पासात मिळते तशी कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. त्यामुळे या प्रवाशांना पूर्ण ३० दिवसांचे पैसे भरावे लागणार आहेत. तसेच सध्या दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर या गाडीचे तिकीट असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात हे दर मुंबई मेट्रोसारखेच चढे असतील, असे समजते.

मुंबईकरांसाठीची वातानुकूलित लोकल आज, मंगळवारी मुंबईत दाखल होणार आहे. ही लोकल कुर्ला कारखान्यात येणार असून तेथे विद्युत तसेच वातानुकूलित यंत्रणेची काही कामे झाल्यावर १६ एप्रिलपासून त्याची चाचणी सुरू होईल. त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी ही लोकल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मात्र सध्या या लोकलच्या तिकिटाचे दर काय असतील, याचे कुतूहल मुंबईकरांमध्ये आहे. या लोकलची किंमत ६० कोटी रुपये असून १२ डब्यांपैकी सहा-सहा डबे एकमेकांना जोडलेले आहेत. लोकलची एकूण किंमत, तिचे आयुर्मान आणि एका फेरीसाठी येणारा खर्च यांचे प्रमाण बघून मगच तिकीट दर ठरवण्यात येणार आहेत.

दिल्ली मेट्रोच्या ८ ते ३० रुपये दरांप्रमाणेच या गाडीचेही तिकीट दर असावेत, असे रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण रेल्वेतील सूत्रांच्या माहितीनुसार मध्य रेल्वेने मुंबई मेट्रोच्या दरांनुसार ठेवले जावेत, असेही सुचवले आहे. याबाबत रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालय अंतिम निर्णय घेणार आहेत. तिकीट दर काहीही असले, तरी या गाडीचा मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना कोणतीही सवलत मिळणार नाही. उपनगरीय पास काढणाऱ्या प्रवाशांना केवळ २० दिवसांच्या प्रवासाचे पैसे भरावे लागतात. उर्वरित रक्कम ही सवलत म्हणून आकारली जात नाही. मात्र वातानुकूलित लोकलचा पास देताना सर्वच्या सर्व ३० दिवसांच्या प्रवासाचे पैसे आकारले जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *