नोकरीवालाच्या प्रतीक्षेत कन्या तिशीकडे!

घर पाहावे बघून आणि लग्न करावे बघून हे काही खोटे नाही याची प्रचिती सध्या ग्रामीण भागात येत आहे. नोकरीवालाच नवरा हवा या इच्छेमुळे अनेक कन्या तिशीला पोहोचल्या आहेत. वडिलांना ती चिंता सतावत असताना दुसरीकडे बेरोजगार मुलांचे वयही वाढत चालले आहे. त्यांनाही मुली मिळत नसल्याने विवाह जमणे कठीण झाले आहे.
एकूणच बदलत्या स्थितीशी जुळवून न घेतल्याने ग्रामीण भागात विवाह संस्थेबद्दल अनेक नवे प्रश्‍न निर्माण होत आहेत. शक्‍यतो नोकरीवाला जावई हवा असा सगळ्यांचाच आग्रह, त्यात गैरही नाही, पण सगळ्यांनाच नोकरी असलेला मुलगा मिळेल याचीही खात्री नाही. मिळालाच तर तो कंपनीत नोकरीला असतो. त्यालाही नाइलाजाने शेवटच्या क्षणी पसंती दिले जाते. या स्थितीत मुलींचे वय तिशीला पोहोचत आहे. त्यामुळे उपवर मुलगी हेही आई-वडिलांच्या चिंतेच कारण बनले आहे. मुलीचे वय पंचविशी-तिशी पार केल्यास अशांचे विवाह जमण्यात पुढे अनेक अडचणी येतात अन्‌ कुटुंबसंस्थेवरही त्याचा विपरित परिणाम होतो. उशिरा विवाह अन्‌ उशिरा मुले-मुली हाही नंतरचा प्रश्‍न असतोच.
बेरोजगार मुलगा नकोच…
गेल्या तीन-चार वर्षांपासून बेरोजगारांचे बुरे दिन सुरू झाले आहेत. नोकरी नाही, दुष्काळामुळे हाताला काम नाही. परिणामी विवाहाचे वय असूनही मुलगी द्यायला कोणी तयार नाही. मोठ्या शेतकऱ्यांच्या मुलालाही मुलगी देण्यास वरपिता तयार नाही अशीही स्थिती आहे. नोकरीवालाच वर पाहिजे, यासाठी वधूपिता हवे ते द्यायला तयार आहे, पण तसा मुलगा मिळणे सध्या अवघड झाले आहे.
आता मुलाकडेच विवाह
ज्या बेरोजगारांचे अथवा शेतकरी व शेतमजुरांच्या मुलाचा विवाह ठरतो, त्यांनाच लग्न काढून द्यावे लागत आहे. तीन-चार वर्षांपर्यंत वधूपित्यालाच विवाहखर्च पार पाडावा लागायचा. आता मुलीच मिळत नसल्याने वरपिता लग्नही काढून द्यायला तयार होत आहे.
यंदा भयंकर दुष्काळी स्थिती आहे. अन्नधान्याची टंचाई जाणवणार नसली तरी पाणी कोठून आणणार हा बाका प्रश्न निर्माण झाला आहे. याचा विवाहांवर परिणाम जाणवत आहे. विवाह जुळत आहेत, पण दिवाळीनंतर विवाह ठेवू, असा समझोता केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *