महात्मा गांधीजींच्या साहित्याचा अभ्यास करून आर्थर रोड कारागृहातील तब्बल ८९ कैद्यांनी ‘गांधी शांती परीक्षा’ उत्तीर्ण केली आहे. यात फाशीची शिक्षा झालेले चार, ‘अंडा सेल’मधील दहा आणि इतर ७५ कैद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘अंडा सेल’मधील दोन कैद्यांनी या परीक्षेत ८० पैकी ७९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या दहा वर्षांपासून मुंबईचे सर्वोदय मंडळ महाराष्ट्रातील विविध कारागृहांत गांधी शांती परीक्षा आयोजित करते. कैद्यात पश्चात्तापाची भावना निर्माण करण्यासह त्यांना सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करावे हा या परीक्षेमागचा मुख्य उद्देश असतो. तसेच कारागृहाबाहेर पडल्यानंतर कैद्याने जबाबदार नागरिक म्हणून समाजात वागवे, यासाठी सर्वोदय मंडळ नेहमीच प्रयत्न करत असते. या परीक्षेपूर्वी गांधीजींच्या मूल्यांची ओळख करून देण्यासाठी कैद्यांसमोर गांधीजींची आत्मकथा वाचून दाखवण्यात येते. याशिवाय व्याख्यानही ठेवण्यात येत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.