नाशिक- पुणे- मुंबई हवाईसेवा, सी-प्लेनची सफर

अनेक वर्षांपासून नाशिककर प्रतीक्षेत असलेल्या हवाईसेवाला 15 जूनचा मुहूर्त सापडला आहे. मेहेर एअर सर्व्हिसेसने ओझर विमानतळावरून नाशिक- पुणे व नाशिक- मुंबई या हवाईमार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी शहरातील उद्योजक व त्यांच्या प्रतिनिधींशी कंपनीचे अधिकारी चर्चा करून सेवेची माहिती देणार आहेत. हवाईसेवेबरोबरच सी-प्लेनद्वारे जॉय राइडचीही सफर घडविली जाणार असून, त्याद्वारे त्याबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे मेहेरचे संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले.

एचएएलच्या अखत्यारीत असलेल्या ओझर विमानतळावर पॅसेंजर टर्मिनलचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले; परंतु एचएएलकडे टर्मिनलचे हस्तांतर न झाल्याने प्रवासी विमानसेवेचे मार्ग बंद झाले होते. जानेवारीत राज्य शासनाने संरक्षण विभागाकडे टर्मिनलचे हस्तांतर केल्यानंतर विमान कंपन्यांनी सेवा पुरविण्याचा विचार सुरू केला. त्याचदरम्यान जुहू ते गंगापूर धरणात सी-प्लेन सेवा देण्याचा विषय पुढे आला. पण सुरू होण्यापूर्वीच ही सेवा गाजली. मेहेर कंपनीने जिल्हा प्रशासन व अन्य परवानगीची पूर्तता केल्यानंतर पुन्हा सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकहून पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने ओझर टर्मिनलवरून नाशिक- पुणे व नाशिक- मुंबई सेवा सुरू केली जाणार आहे. वेळेची निश्‍चिती शुक्रवारच्या बैठकीत केली जाणार आहे. पण मुंबई व पुण्याकडे सकाळी विमाने उड्डाण करतील व सायंकाळी पुन्हा परततील. ओझर विमानतळावरच पार्किंग होणार आहे. सुरवातीला नऊ सीटर व त्यानंतर 15 ऑगस्टपासून अठरा सीटरची विमाने उड्डाण करतील. नऊ सीटर विमानात सात प्रवाशांची निश्‍चिती झाली, तरी कंपनीला परवडणार असल्याने विमानसेवा अखंडित सुरू राहील, अशी अपेक्षा आहे. तीन महिने आगाऊ ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था कंपनीमार्फत केली जाणार असल्याचे “तान‘च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. “मेहेर‘चे संचालक सुदर्शन मान, “तान‘चे अध्यक्ष दत्ता भालेराव, कार्याध्यक्ष सागर वाघचौरे, उपाध्यक्ष राजेंद्र बकरे, माजी अध्यक्ष जयेश तळेगावकर उपस्थित होते.

जॉय राइडची सोय
सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमित्त साधून सी-प्लेनद्वारे त्र्यंबकेश्‍वर ते गंगापूर धरण व गंगापूर धरण ते नाशिक शहराचा फेरफटका मारण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. विमानातून सैर करण्याचा आनंद व सी-प्लेनबाबत असलेले गैरसमज यातून दूर करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे “मेहेर‘चे संचालक सुदर्शन मान यांनी सांगितले.

गोल्डन ट्रॅंगलवर लक्ष
औद्योगिकदृष्ट्या मुंबई-पुणे-नाशिक गोल्डन ट्रॅंगल विकसित होत असल्याने या शहरात कमी वेळेत जाण्यासाठी हवाईसेवेची मागणी वाढू लागल्याने नाशिकला प्राधान्य देण्यात आले आहे. ओझर विमानतळावर पार्किंगचा खर्च कमी असल्याने विमान कंपन्यांना त्याचा फायदा होणार आहे. नाशिकसोबतच कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद या शहरांतही हवाईसेवा सुरू केली जाणार असल्याचे मेहेर कंपनीतर्फे सांगण्यात आले.

कॉर्पोरेट क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून नाशिकहून पुणे व मुंबई हवाईसेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रारंभी नऊ त्यानंतर अठरा सीटर विमानाची सोय केली जाणार आहे.
सिद्धार्थ वर्मा, संचालक, मेहेर एअर सर्व्हिसेस

शहराच्या प्रगतीसाठी हवाईसेवा सुरू होणे गरजेचे आहे. मेहेर एअर सर्व्हिसेसने पुढाकार घेतला असून, गरज लक्षात घेता त्यास प्रतिसाद मिळेल.
दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *