दादरच्या शिवाजी पार्कच्या कोपऱ्यावरील ‘आस्वाद’ हॉटेलच्या मिसळपावची चव आता जगाच्या पाठीवर सर्वांना कळणार आहे. या मिसळपावला लंडनमध्ये पार पडलेल्या ‘फूडी हब’ या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चव असलेल्या शाकाहारी पदार्थाचा सन्मान मिळाला आहे. त्यामुळे अर्थातच मुंबईकरांची व मिसळपावप्रेमींची कॉलर ताठ झाली आहे.
जगभरातील ७ देशांमधून ‘आस्वाद’च्या मिसळपावने हा बहुमान पटकावला आहे. ‘या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या मातीतले पदार्थ जगाच्या पाठीवर पोहोचवण्याच्या स्वप्नाला आणखी बळ मिळाले आहे’, असे हॉटेलचे मालक सूर्यकांत सरजोशी यांनी सांगितले. ‘मटकीची उसळ, घरगुती मसाले व चांगल्या दर्जाचे फरसाण यामुळे हा पदार्थ लोकांच्या पसंतीला उतरतो’, असेही त्यांनी सांगितले.
नामांकन मिळेपर्यंत सरजोशी यांना या स्पर्धेसाठी ‘आस्वाद’च्या मिसळपावचा विचार केला जात असल्याची कल्पनाही नव्हती. स्पर्धा पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. ‘फूडी हब’चे स्थानिक प्रतिनिधी विविध पदार्थांची नामांकने त्यांच्या मुख्य कार्यालयात पाठवतात. त्यानंतर नामांकन जाहीर झाल्यानंतर संबंधितांना त्याची कल्पना दिली जाते. त्यानंतर केंद्रीय टीम हे पदार्थ टेस्ट करते. या स्पर्धेत सुमारे ३०-४० देशांमधून नामांकने येतात. ‘फूडी हब’चे मुंबईचे प्रतिनिधी कल्याण करमरकर यांनी या स्पर्धेमध्ये मिसळपावची ओळख करून दिली होती.
महाराष्ट्रातून इतर देशांमध्ये स्थायिक झालेले नागरिक महाराष्ट्राच्या मातीतले काही पदार्थ खूपच मिस करतात. अशा स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवलेले पदार्थ आता जगाच्या पाठीवर इतर हॉटेल्समध्येही उपलब्ध होतील, अशी आशा मिसळपावला मिळालेल्या या ग्लोबल सन्मानाने त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.