२+२=३, गुजरातमधील शिक्षकांनी गणित बिघडवले!

२+२=३, गुजरातमधील शिक्षकांनी गणित बिघडवले!

‘२+२ बरोबर किती?’, असे विचारले तर ‘केजी’तलं मुलंही ४ असं उत्तर देतील पण गुजरातमधील शिक्षकांनी २+२ ची बेरीज ३ करून गणिताची ‘ऐशी की तैशी’ करून टाकली आहे. शिक्षकांच्या या ‘ढ’ पणामुळे दहावीच्या हजारो उत्तर पत्रिका पुन्हा तपासण्याची ‘डबल’ ड्युटी शिक्षण विभागाला करावी लागली आहे.

गुजरातमध्ये शिक्षणाचे कसे तीन तेरा वाजलेत याचा भयंकर प्रत्यय एका धक्कादायक प्रकरणाने आला आहे. दहावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राज्यात त्रिस्तरीय व्यवस्था आहे. त्यानुसार शिक्षक, वरिष्ठ शिक्षक आणि परीक्षा नियंत्रक अशा तिघांकडून प्रत्येक उत्तरपत्रिकेची तपासणी होते. असं असूनही गणिताची उत्तरपत्रिका तपासताना या सर्वांनीच घोडचुका करून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा जीव टांगणीला लावण्याचे काम केले. २+२ चे उत्तर ४ ऐवजी ३ मानून ‘बरोबर’ उत्तरांवर या शिक्षकांनी ‘फुली’ मारली. गंभीर म्हणजे ही बाब नियंत्रकांच्याही लक्षात आली नाही.

दरम्यान, ऑनलाइन रिझल्टसाठी मार्क्स फीड केले जात असताना ही चूक लक्षात आली आणि एकच खळबळ उडाली. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही चूक दूरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले. सर्व उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यात आली आणि नव्याने मार्कशीट बनवण्यात आल्या. याबाबत शिक्षण मंडळाने दहावी परीक्षांसाठी नेमलेले विशेष अधिकारी एम.एम. पठाण यांना विचारले असता त्यांनी शिक्षकांच्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून आम्ही पूर्ण प्रक्रिया नव्याने केली आहे. शिक्षकांनी एवढी साधी चूक करणे ही गंभीर बाब आहे. वेळीच ही चूक लक्षात आल्यामुळे आम्ही चूक सुधारू शकलो, असे सांगितले. तर आमच्या शिक्षकांकडून अशा प्रकारच्या साध्या चुका होतील, यावर आमचा विश्वासच बसत नसल्याचे बारावी परीक्षांचे सचिव जी.डी. पटेल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *