गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, पंकजा मुंडेंचा निर्धार

वर्षभरात बाबांची आठवण आली नाही असा एकही दिवस नाही. मुंडेसाहेब हे साऱ्या महाराष्ट्राचे लोकनेते होते. त्यांच्या स्वप्नातील नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग दृष्टीक्षेपात आहे. पण मुंडेसाहेबांची अनेक अधुरी स्वप्नं पूर्ण करायची आहेत. त्यासाठी मी प्रयत्न करत असून, गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, असा निर्धार राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.

गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतीदिनी पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे आणि यशश्री मुंडे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नगर-बीड-परळी मार्गासाठी राज्य सरकार चौदाशे कोटी देणार!

यावेळी वडिलांच्या आठवणींनी तीनही बहिणी भावूक झाल्या. पण मुंडेंच्या स्वप्नपूर्तीसाठी एकजुटीने काम करू, असाही निर्धार तिन्ही बहिणींनी केला.

“मुंडेसाहेब गेल्यानंतरचा एक वर्षाचा काळ फार कठीण होता. साहेबांच्या नेतृत्त्वाची उणीव भासली. मुंडे साहेबांनी लोकांशी जी नाळ बांधून ठेवली होती ती घट्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

तसंच मुंडेसाहेबांच्या स्मृतीदिनी नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी निधी देऊन सरकारने बीडकरांना अनोखी भेट दिल्याची भावना पंकजा यांनी व्यक्त केली.

दुसरीकेड गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांची जागा फक्त पंकजाताईच घेऊ शकते, असं खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या. तर सध्या दोन्ही ताईंना साथ देणं हेच काम असून, राजकारण येईन की नाही माहित नाही, असं यशश्री मुंडे म्हणाल्या.

राजकारणात प्रवेश करण्याचा सध्या विचार नाही, असं यशश्री यांनी स्पष्ट केलं.

नगर-बीड- परळी रेल्वेमार्गासाठी 1413 कोटी

दरम्यान, मुंडेंच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं बीड रेल्वेसंदर्भात राज्य सरकारनं महत्वपूर्ण घोषणा केली. नगर-बीड- परळी  रेल्वेमार्गासाठीचा निम्मा खर्च म्हणजे जवळपास 1413 कोटी राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे जवळपास 25 वर्षे संथ गतीनं सुरु असलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.

2009 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना तेव्हा हजार कोटींच्या खर्चापैकी 500 कोटी खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारनं केला होता. पण प्रकल्पाचा खर्च वाढल्यानं काम रखडलं होतं. विशेष म्हणजे मागच्या आठवड्यातच पंतप्रधान मोदी यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये या रेल्वे प्रकल्पाची विचारणा केली होती. त्यानंतर आता मुंडेंच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त झालेल्या या घोषणेमुळे तरी आता बीडकरांची प्रतीक्षा संपेल अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *