आणखी १३ टोल बंद होणार

आणखी १३ टोल बंद होणार

देशात राष्ट्रीय महामार्गावरील ६२ टोल बंद करण्यात आले असून त्यापैकी १६ राज्यातील आहेत. तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील १३ टोल यापुढील काळात बंद करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केली. मुंबईतल्या बीपीटीच्या १७ एकर जागेवर फाइव्ह स्टार हॉस्पिटल बांधण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून या सरकारने घेतलेल्या निर्णयांची गडकरी यांनी माहिती दिली. नवीन परिवहन कायदा पुढच्या संसदीय अधिवेशनात आणण्यात येईल. या कायद्यासंदर्भात काही शंका असतील तर राज्यांनी त्या केंद्राला कळवाव्यात. देशात ३५ ते ४० टक्के ड्रायव्हिंग परवाने बोगस आहेत. त्यावर उपाय करण्याची गरज आहे. आरटीओ बंद करू, असे मी म्हणालो नव्हतो. आरटीओचा कारभार स्वच्छ, पारदर्शक करण्यासाठी पावले उचलत आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.

‘दिल्लीत राज्याचे अनेक विषय प्रलंबित आहेत. ते विषय तातडीने मार्गी लागावेत, यासाठी आम्ही राज्याचे दूत म्हणून दिल्लीत काम करत आहोत. माझी नजर दिल्लीतच आहे. पण महाराष्ट्रातही लक्ष आहे. एका वर्षात अनेक प्रश्न सोडविले आहेत, त्यामुळे हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे’, असेही गडकरी यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.

महागाईचा दर ४.२ पर्यंत खाली आला आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे १६ कोटी लोकांनी बँकेत खाते उघडले. यावर्षी दसऱ्याच्या मुहुर्तावर बद्रिनाथ, अमरनाथ, गंगोत्री या ठिकाणी मोठ्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जमीन संपादन विधेयकाबाबत शिवसेना सरकारसोबत आहे. तुम्ही आग लावू नका. तुम्हाला वाटते तसे चित्र नाही, असेही त्यांनी नमूद केले.

‘मुंबई-गोवा’ जमीनसंपादन सप्टेंबरपर्यंत

मुंबई गोवा चौपदरीकरणासाठी यावर्षी सप्टेंबरपर्यंत जमीन ताब्यात घेण्याचे काम पूर्ण होणार असून, ५० टक्के जमीन मिळाली की निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर २०१७ पर्यंत या चौपदीकरणाचे काम पूर्ण होईल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले. चिपळूण येथे इलेव्हेटेड हायवे, राजापूरला बायपास आणि कशेडी घाटात बोगदा असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *