टीईटी पेपरफुटी प्रकरण; पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात, आरोपींबाबत मोठी माहिती समोर; दीड कोटींना विक्रीची ऑफर

उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नीटचा पेपर फुटल्यानं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्र खळबळ उडाली आहे. तसेच टीईटीचा पेपर फुटल्यानंतर देशभरातून आता विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याकरिता आयोजित केली जाणारी एक राज्यस्तरीय परीक्षा आहे.

पत्रकार परिषदेत पोलिसांनी काय माहिती दिली?

उद्या होणाऱ्या टीईटी पेपरफुटी प्रकरणी भिवंडी पोलिसांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत मोठी माहिती दिली आहे. ‘टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परिक्षेचे पेपर सापडले आणि ते आम्ही जप्त केले आहेत. पेपर विकणारे जे आरोपी होते त्यांना आम्ही ट्रॅप लावून पकडलंय’, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

पुढे ते म्हणाले की, ‘आरोपींची दीड कोंटींची मागणी होती आणि ॲडव्हान्समध्ये त्यांना काही पैसे हवे होते, असं चौकशीत समोर आलं आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य बघता वरिष्ठांच्या आदेशाने एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. तपास पथकाचे मुख्य अधिकारी म्हणून डी.सी.पी पवन बनसोड आहेत. तसेच या पथकामध्ये दोन ए.सी.पी आणि नऊ पी.आय, ए.पी.आय आणि बाकी इतर कर्मचारी मिळून 20 कर्मचाऱ्यांचं हे विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. पुढील तपासासाठी विविध ठिकाणी आमचे तपास पथकं रवाना झाले आहेत. यामध्ये सखोल तपास करण्यात येईल. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोरता कठोर कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती देखील भिवंडी पोलिसांनी दिली आहे.

मुख्ख आरोपी फरार

पोलीस पुढे काय म्हणाले, ‘हे पेपर इतर ठिकाणी देखील विकले गेले असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्य आरोपी पकडल्यानंतर सर्व प्रकरणाचा खुलासा होईल. सर्व शक्यता गृहीत धरुन हा तपास सुरु केलेला आहे. या प्रकरणात कुणाकुणाचा समावेश आहे? पेपर कुठे-कुठे विक्री केलेले आहेत? या सर्व अनुषंगाने आमचा तपास सुरु आहे. मात्र, या प्रकरणातला मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आमच्या ताब्यात आता तीन आरोपी आहेत. त्यातला एक हरियाणाचा आहे तर दोनजण बिहारमधील आहेत. एकंदरीत आतापर्यंत केलेल्या तपासात ही माहिती समोर आली की, ते सर्व दिल्लीवरुन आले होते. पण त्यांना कुठून पेपर मिळाला? त्यांनी हा पेपर कसा प्राप्त केला? हा सर्व तपास आम्ही करत आहोत. आरोपींकडे उद्याच्या टीईटी पेपरच्या चार वेगवेगळ्या कॉपी मिळाल्या आहेत’. राजीव श्रीप्रयाग शाव (वय 45), आकाश कुमार स्वराज कुमार (वय 30) आणि धीरज बलराज सिंग (वय 28) असं आरोपींची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टीईटीची फेरपरीक्षा कधी होणार?

टीईटीचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ‘पेपर फुटीनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे, याचं नियोजन लवकर कळवू, असं प्रिया शिंदे यांनी सांगितलं’. ‘जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सदर प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते’, असं प्रिया शिंदे म्हणाल्या. ‘तसेच महाराष्ट्रातील 6 लाख 128 शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. 6 लाख 126 परिक्षार्थींकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल’, अशी माहिती प्रिया शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *