केरळात गुरुवारी रात्री वरुणराजाचे जोरदार आगमन झाले. केरळच्या कोची आणि तिरुवनंतपूरम भागात वीजेच्या गडगडाटासह सुमारे दीड तास मुसळधार पाऊस कोसळला. या पहिल्या पावसाने येथील बळीराज सुखावला आहे. तर उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या जनतेला आणि शेतक-यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
सामान्यत: केरळमध्ये एक जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. मात्र यावर्षी केरळमध्ये मान्सून पाच जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र त्यापूर्वी एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी मान्सून मुंबईमध्ये पोहोचतो.
मान्सूनच्या पावसाला पुढे सरकायला सध्या अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे हवामानात फारसे बदल झाले नाहीत तर, मान्सून १३ ते १५ जूनपर्यंत मुंबईत सक्रीय होईल.