किनवटमधील भगतसिंगनगर येथील महम्मद लायक महम्मद युसूफ या व्यापाऱ्याच्या घरी ३१ मे रोजी चोरी झाली. त्या घरफोडीत संजय धोत्रेसह अन्य दोघांवर घरफोडीच्या गुन्ह्याची पोलिसांत नोंद करण्यात आली. त्या प्रकरणी तपास करताना पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद भारती यांचा फौजफाटा गेला होता. या पथकाला धोत्रे कुटुंबीयांनी धक्काबुक्की केली. पोलिसांची मोटारसायकल फोडली. त्यावर चिडून किनवट पोलिस प्रशासनाने सोमवारी रात्री नांदेड येथून पोलिसांची कुमक बोलावून मंगळवारी पहाटे ३ ते ४च्या दरम्यान गंगानगरमध्ये रस्त्यावर झोपलेल्यांना २० ते २५ जणांना मारहाण झाली.
मारोती सुंकलवार, लहुजी ब्रिगेडचे सुरेश मस्के, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, नागनाथ भालेराव, नरेश कलगुटवार, मधुकर अन्नेलवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक जोगदंड यांच्याकडे फिर्याद दाखल केली असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांच्या कारवाईविरोधात समाज बांधव रस्त्यावर उतरले होते. सर्व शांततेत पार पडत असताना संजय पिराजी धोत्रे याने पोलिस ठाण्यात प्रवेश केला. खोटा गुन्हा लावल्याचा आरोप करून त्याने अंगावर पेट्रोल ओतून पोलिसांच्या साक्षीने पेटवून घेतले. त्यात तो पूर्णतः भाजला गेला. त्याला गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर अदिलाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.