सुरज परमार आत्महत्या प्रकरणी नवा खूलासा

सुरज परमार आत्महत्या प्रकरणी नवा खूलासा

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ठाणे महापालिकेच्या चार नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख असल्याने हे नगरसेवक सध्या तुरुंगात आहेत. मात्र या प्रकरणाचे आरोपपत्र पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर या सुसाईड नोटमधील संपूर्ण मजकूर समोर आला आहे. यात परमार यांनी स्वत:च्या अनेक चुकांची कबुली दिली असून त्यांच्या कॉसमॉस कंपनीत सुरू आलेल्या गैरव्यवस्थापनालाही त्यांनी स्वत:च जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

परमार यांनी लिहिलेली ही सुसाईड नोट सुमारे २० पानांची असून आत्तापर्यंत ही सुसाईड नोट फक्त हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण या ठाण्यातील ४ नगरसेकांची नावे त्यात आल्यानेच ती सर्वाना माहित होती. मात्र या सुसाईड नोटच्या उर्वरित १९ पानांमध्ये परमार यांनी काय लिहिले आहे? याचा उलगडा पोलिसांनी ही सुसाईड नोट आरोपपत्रासोबत जोडल्यानंतर झाला आहे. ही सुसाईड नोट ८ विभागात विभागली असून त्यात कुटंबीय, मित्र, भागीदार, ग्राहक, सरकार यांचा उल्लेख आहे. मला भागीदांरांनी दिलेल्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीचा मी गैरवापर केला, विविध ठिकाणी चुकीच्या जमिनींची खरेदी केली, चुकीच्या प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले, त्यातच माझ्या वकीलांनीही मला चुकीचे सल्ले दिले असे परमार यांनी म्हटले आहे. तर कॉसमॉस कंपनीत झालेल्या गैरव्यवस्थापनालाही मी एकटाच जबाबदार असल्याची कबुली त्यांनी या चिठ्ठीत दिली आहे.

मी स्वत:ला खुप स्मार्ट समजत होतो. मात्र मी मुर्ख निघालो, माझे सहकारी आणि माझ्या कुटुंबाचा माझ्यावर खुप विश्वास होता. मात्र माझ्या चुकांमुळे मी कंपनी आणि माझ्या कुटुंबाचे भवितव्य उद्ध्वस्त करतोय असेही परमार यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मागील दोन महिन्यांपासून मी दडपणाखाली होतो, मात्र मी कुणाला ठार मारु शकत नसल्याने मी स्वत:लाच संपवायचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या धोरणाचा भरवसा नसून ते कधीही बदलण्याची भिती मला आहे, त्यामुळेच मला रात्री झोपही लागत नाही, मी स्वत:ला अपघातात संपवणार होतो. मात्र, त्यामुळे बिल्डरांच्या व्यथा काय असतात, हे समोर आले नसते. आणि म्हणूनच मी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

शिवाय आपल्या कंपनीबाबत लिहिताना माझ्या गैरव्यवस्थापनामुळे मला कुणाला तोंड दाखवायचीही लाज वाटत होती, असे त्यांनी म्हटले असून प्राप्तीकर विभागाने त्यांच्या कार्यालयावर टाकलेल्या धाडीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. या धाडीत मी त्यांना प्रचंड दबावाखाली माहिती दिली असे स्पष्टीकरण देत त्यांनी आपल्या भागीदारांची माफी मागितली आहे. तर सरकारच्या प्रत्येक योजनेचा उद्देश पैसे उकळणे हाच असून यात बिल्डरला बडा बकरा समजले जाते. जनमानसात बिल्डरांची चोर अशी प्रतिमा निर्माण केली जाते, मात्र आपल्या मुलांना सांग तुमचे वडील चीटर नव्हते, असेही त्यांनी या सुसाईड नोटमध्ये आपल्या पत्नीला उद्देशून लिहिले आहे.

भिवंडीत काव्या आणि फायबर ग्लासचे प्रकल्प हाती घेतले मात्र ते लाल फितीच्या कारभारात रखडले. योगी प्रकल्पातली गुंतवणूक चुकीची ठरली. ज्वेलचा प्लॅन चेंज केल्यामुळेच त्याच्या परवानग्या रखडल्या. ती माझी घोडचूक होती. अन्यथा हा प्रकल्प मार्गी लागला असता. प्रकल्पांना ओसी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत होतो. मात्र, काही ठिकाणी दंड तर काही ठिकाणी नियम आडवे येत असल्याने माझी कोंडी होत असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. भिवंडीत अरुण पाटील यांच्या प्रकल्पात पुढे काही करू नकोस. तिथे गुंतविलेले पैसे विसरून जा असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलांना या चिठ्ठीच्या माध्यातून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *