आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी २७ फेब्रुवारीला एकमेकांशी भिडतील. २४ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१६ दरम्यान आशिया चषक रंगेल.
सलामीला (२४ फेब्रुवारी) भारताची गाठ यजमान बांगलादेशशी आहे. पाकिस्ताननंतर भारत गतविजेता श्रीलंकेशी (१ मार्च) दोन हात करेल. भारत आणि पाकिस्तान संघ गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये भिडले होते. मात्र यंदा आशिया चषक आणि त्यानंतर मार्चमध्ये होणा-या टी-२० वर्ल्डकपच्या माध्यमातून तीन आठवडय़ांमध्ये दोनदा भिडतील. भारत-पाकिस्तान आणि भारत-श्रीलंकेनंतरची आणखी एक हायप्रोफाईल लढत म्हणजे पाकिस्तान वि. श्रीलंका मॅच ४ मार्चला होईल. आशिया चषकातील पाचवा संघ हा पात्रता फेरीतून निवडला जाईल. त्यासाठी अफगाणिस्तानसह ओमान, हाँगकाँग आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये चुरस आहे.
वनडे नव्हे टी-२० – आशिया चषक स्पर्धा प्रथमच टी-२० फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे. साखळीसह अंतिम अशा एकूण ११ लढती मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर होतील.