‘स्मार्ट सिटी’तून मुंबईला वगळले!

‘स्मार्ट सिटी’तून मुंबईला वगळले!

मोठा गाजावाजा सुरू असलेल्या केंद्रातील भाजपा सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून देशाची आर्थिक राजधानी मुंबईला वगळण्यात आले आहे.

गुरुवारी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पहिल्या टप्प्यात विकास करण्यात येणा-या २० शहरांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूरला स्थान देण्यात आले आहे. तर भुवनेश्वरला सर्वात वरचा क्रमांक देताना पुणे, जयपूरला अनुक्रमे दुसरे स्थान देण्यात आले आहे.

मात्र केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल मिळवून देणा-या मुंबईचा मात्र भाजपा सरकारला पूर्णपणे विसर पडला आहे.

नवी दिल्ली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास करण्यात येणा-या शहरांची पहिली यादी जाहीर केली. यात पुणे, अहमदाबाद, चेन्नई, भोपाळ ही शहरे स्मार्ट करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत या शहरांना प्राथमिक सोयीसुविधा पुरवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नायडू यांनी सांगितले. वीज, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आयटी जोडणी, ई-गव्हर्नस आणि नागरिकांचा सहभाग आदी गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत देशभरातील ९७ शहरांसाठी सुमारे ४८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यांच्या नगरविकास खात्यावर स्मार्ट सिटी उभारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

स्थानिक नागरी संस्थांच्या स्तरावर सर्व नियोजन आराखडे तयार करण्यात येतील. केंद्राकडून यात कोणतीही गोष्ट करण्यात येणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. नियोजन व विकास स्पध्रेतून या शहरांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेत स्थान मिळवलेल्या विजेत्या शहरांनी सक्षम नियोजन व आराखडे तयार केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश, बिहारलाही स्थान नाही

निवडलेल्या शहरांना पहिल्या दोन वर्षात २०० कोटी रुपये तर नंतरच्या तीन वर्षात १०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. पाच राज्यांच्या राजधानीच्या शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी योजनेत भाजपाला दिल्लीची गादी मिळवून देणा-या उत्तर प्रदेश, बिहारमधील प्रमुख शहरांनाही (अलाहाबाद, पाटणा, लखनौ,) स्थान देण्यात आलेले नाही. ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमधीलही महत्त्वाच्या शहरांना स्मार्ट सिटीत स्थान मिळालेले नाही.

स्मार्ट सिटीत निवड झालेली २० शहरे

भुवनेश्वर, पुणे, जयपूर, कोची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम, सोलापूर, दावणगिरी, इंदोर, एनडीएमसी, कोईम्बतूर, काकिनाडा, बेळगाव, उदयपूर, गुवाहाटी, सूरत, चेन्नई, लुधियाना आणि भोपाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *