ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे दिर्घ आजाराने बुधवारी सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. दिनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी यांचा जन्म २५ जुलै १९३४ मध्ये झाला. १९६८ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. केली होती. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रात आणि परिसंवादांमध्ये भाग घेतला होता. साहित्य क्षेत्रात कुलकर्णी ‘द. भि.’ म्हणून परिचित होते.
कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार, दीनानाथ प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच नागपूर विद्यापीठाचे ना. के. बेहेरे सुवर्णपदक , महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला. ‘अंतरिक्ष फिरलो पण’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला.