समाजसेवा करणारे सिद्धिविनायक गणपती मंदिर

समाजसेवा करणारे सिद्धिविनायक गणपती मंदिर

एकेकाळी खास मुंबईच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेले हे मंदिर आता जगभरातील भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतीक झालेले आहे. त्यामुळेच मंदिरात दररोज लाखो भाविक गणरायाचे दर्शन घेऊन कृतकृत्य होत असतात. भक्तांकडून आलेला पैसा समाजासाठीच वापरायचा, असे ध्येय स्वीकारलेल्या या मंदिराच्या न्यासाकडून दरवर्षी कोटय़वधी रुपये विविध सामाजिक कामांसाठी दिले जातात. त्यांचा विनियोग कसा होतो. त्याची देखरेखही मंदिर समितीकडून केली जाते. त्यामुळेच या मंदिराविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिर हे पुरातन असून कार्तिक शुद्ध चतुर्दशी शालिवाहन शके १७२३ (सन १८०१) रोजी त्याचा पहिला जीर्णोद्धार, नूतनीकरण विधिपूर्वक करण्यात आले, अशी माहिती मंदिर न्यासाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्यातून मिळते.

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर हे दोनशे वर्षापासूनचे असल्याचे यावरून स्पष्ट होते. मंदिराचा पहिला जीर्णोद्धार मुंबईचे मूळ रहिवासी असणा-या लक्ष्मण विठू पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्याचे समजते. मंदिर त्यापूर्वीदेखील अस्तित्वात असल्याचे अनुमान काढता येईल. मंदिरातील श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची असून बैठकीपासून किरीटापर्यंत अडीच फूट उंचीची व दोन फूट रुंदीची अशी आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून तिच्या वरच्या उजव्या हातात कमळ तर डाव्या हातात परशू, खालील उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात मोदकाची वाटी आहे. श्रीच्या गळ्यात सर्पाकृती यज्ञोपवीत (जानवे) आहे.

पाषाणाच्या मखरात कोरलेल्या श्रीसिद्धिविनायकाच्या बाजूला रिद्धी व सिद्धी या ऐश्वर्य, भरभराट, सुख, समृद्धी व मांगल्य यांच्या देवता उभ्या आहेत. मुंबईच्या बाणगंगा देवस्थान संकुलात अगदी अशीच संगमरवरी मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती एकाच कारागिराने घडवल्या असाव्यात असे अनुमान काढण्यात येते. बाणगंगा देवस्थान संकुल ५०० वर्षाहून अधिक जुने आहे हे लक्षात घेता प्रभादेवी येथील मंदिराची निर्मिती निदान ५०० वर्षाइतकी पुरातन असावी, असे अनुमान काढणे चुकीचे होणार नाही, असे मंदिराच्या साहित्यातून मांडण्यात आले आहे.

१९३६पासून मंदिरातील पूजाअर्चा व अनुषंगिक व्यवस्था गोविंदराव फाटक यांच्याकडून करण्यात येऊ लागली. श्रीसंत जांभेकर महाराज यांच्या आदेशानुसार फाटक हे गिरणीतील नोकरी सांभाळून हे काम करू लागले. त्याच काळात मंदिराची विश्वस्त व्यवस्था करण्यात आली. शासनाचे अधिकारी असलेले प्रशासकीय विश्वस्त यांच्याकडून मंदिराचे व्यवस्थापन होऊ लागले. त्यांनी योग्य व्यवस्थापन, पूजाअर्चा करण्यासाठी आवश्यक कर्मचारी, पुजारी यांच्या नियुक्त्याही केल्या. या काळात १९५४मध्ये मंदिराच्या जागेतील तलाव बुजवून एकूण भूभागातील भूखंड श्रीसिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेला ५० वर्षाच्या काळासाठी भाडेपट्टयाने देण्यात आला.

मंदिराला त्याकाळी मिळणा-या तुटपुंज्या उत्पन्नातून व्यवस्थापनाचा खर्च भागवण्यासाठी पूरक सहाय्य मिळवण्यासाठी हा भाडेपट्टा देण्यात आला. त्यानंतर मंदिराची लोकप्रियता वाढू लागली. त्यानंतर शासनाने या विश्वस्त व्यवस्थेची पुनर्रचना करून थेट शासनाच्या देखरेखीखाली, तिच्या अतिरिक्त निधीतून भक्तांना सुविधा देणे, अधिक व्यापक समाजकल्याण हाती घेणे या उद्देशाने एका समितीमार्फत तिचे व्यवस्थापन व्हावे, यासाठी एक स्वतंत्र अधिनियम करण्याचे ठरवले. हे तातडीने करण्यासाठी ११ ऑक्टोबर १९८० रोजी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी) असा अध्यादेश जारी केला. त्याचे रीतसर अधिनियमात रूपांतर करण्यात आले.

त्यानुसार आता श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम १९८०च्या तरतुदीनुसार शासन नियुक्त अध्यक्ष, कोषाध्यक्ष व सात किंवा नऊपेक्षा कमी इतके इतर सदस्य यांच्या मिळून झालेल्या समितीद्वारे विश्वस्त व्यवस्थेचे (न्यासाचे) व्यवस्थापन, प्रशासन करण्यात येते.
मंदिराची जुनी वास्तू फार लहान व दर्शन घेण्याच्या दृष्टीने फार गैरसोयीची होती. भक्तांच्या दिवसेंदिवस वाढणा-या संख्येला ती अत्यंत अपुरी पडू लागली होती.

एका वेळी दाटीवाटीने केवळ १५ ते २० भक्त त्यात सामावू शकत होते. या भक्तांना दर्शन सुलभतेने व शीघ्रतेने घेता यावे, त्यांना श्रींच्या सेवेचे समाधान लाभावे, पूजेसाठी सुविधांची तरतूद करण्यात यावी या उद्देशाने मंदिराच्या विस्तृतीकरणाच्या, नूतनीकरणाच्या प्रकल्पाचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या शुभहस्ते मंदिराच्या प्रस्तावित प्रासादवास्तूचा भूमिपूजन समारंभ पार पडला.

मंदिराची आजची नयनरम्य व सुबक प्रासादवास्तू साकार झाली. या प्रासादवास्तूच्या कळस प्रतिष्ठापनेचा सोहळा भव्यतेने व थाटामाटात साजरा करण्यात आला. वैशाख वद्य एकादशी शके १९१६ शनिवार ४ जून १९९४ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ झाला.

प्रत्यक्ष कळस प्रतिष्ठापना सोहळा जगदगुरू श्रीशंकराचार्य दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठ श्रृंगेरी भारतीतीर्थ महास्वामीजी यांच्या हस्ते ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी शके १९१६ सोमवार, १३ जून १९९४ रोजी पार पडला. मंदिराच्या, व्यवस्थापनाच्या दोनशे वर्षाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा दिवस होता.

श्रीसिद्धिविनायकाची महती

या मंदिराची रचना १९ नोव्हेंबर १८०२ रोजी झाली. या मंदिराच्या परिसरात खूप झाडी असून त्यात नारळांची झाडे असंख्य होती. मूर्ती उजव्या सोंडेची असून, तिच्या वरच्या एका हातात कमळ, दुस-या हातात लहान परशू, खालील उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात मोदकाची वाटी आहे.

ही मूर्ती महादेव शंभोप्रमाणे त्रिनेत्रधारी आहे. ही मूर्ती एका पाषाणात कोरलेली असून चरणाजवळ लहानसा मूषक आहे. हा सिद्धिविनायक कमळावर पद्मासन घालून बसलेला आहे. फक्त गणेशाला (नरकुंजररूपाला) गणपती म्हणतात. मात्र, रिद्धी व सिद्धीसहित असलेल्या गणेशाला महागणपती म्हणतात.

मंदिराची रचना

मंदिराची वास्तू पाच मजली असून गाभा-यावरील प्रत्येक मजल्यावर वेष्ठित भिंती बांधून कळसापर्यंत मोकळी जागा राहील, याची जाणीवपूर्वक काळजी घेतली आहे. १३ जून १९९४ रोजी मंदिराची नवीन वास्तू बांधण्यात आली. ही वास्तू बांधताना जुन्या मंदिराचा कळस उतरवून बांधलेला नवा कळस हा पंधराशे किलो वजनाचा असून १२ फूट उंच, सुवर्णवेष्ठित आहे.

गाभा-यासमोर दुरून दर्शन घेण्यासाठी १३ ते १४ फूट उंचीचा सभामंडप असून, तेथे भक्तजनांनी करावयाच्या पूजा, गणेशयाग, श्री सत्यनारायणाच्या पूजा होतात. पहिला मजला पोटमाळा म्हणून पूजा व दर्शनासाठी उपयोगात आणला जातो. दुस-या मजल्यावर नैवेद्यासाठी स्वयंपाक व ब्रह्मवंृदांसाठी विश्रांतिगृह असून स्वयंपाकघर व गाभारा उदवाहनाने जोडला आहे.

सुरक्षा व्यवस्था म्हणून सीसीटीव्ही कॅमेरांच्या संपूर्ण युनिटची योजना करण्यात आलेली आहे. तिस-या मजल्यावर न्यासाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष व कार्यकारी अधिकारी यांची दालने असून सदस्य कक्ष, समिती सभागृह, स्वागत व दूरध्वनी कक्षही तिथेच आहे.

चौथ्या मजल्यावर आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असे प्रशासन विभाग, लेखा विभाग, कॅश काऊंटिंग लाऊंज व दागदागिने मूल्यांकन विभाग स्थापित करण्यात आले आहेत. तसेच मजल्यावर उपकार्यकारी अधिकारी आणि वित्त व लेखा अधिकारी यांची दालने आहेत. मंगळवारी संकष्ट चतुर्थी व अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

नैसर्गिक आपत्तीत मंदिर न्यासाकडून मदतीचा हात

१) २००० रोजी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांसाठी २५ लाख.

२) २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व मंडणगड तालुक्यातील आपादग्रस्तांसाठी ५ कोटींचे अर्थसहाय्य. त्यातून घरे बांधून दिली. तसेच महाड तालुक्यातील तुडील गावात अतिवृष्टीमुळे पडलेली उर्दू शाळा पुन्हा बांधून दिली व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवले.

३) २६ नोव्हेंबर २००८च्या अतिरेकी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाखांची मदत

४) २०१३ रोजी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असताना दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २८ कोटींची मदत. त्यातील ८ कोटी रुपये फक्त जालना जिल्ह्यासाठी देण्यात आले होते.

५) २०१३ रोजी उत्तराखंडमध्ये जलप्रलयाने प्रभावित झालेल्या आपादग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस २५ लाखांचे अर्थसहाय्य.

६) जुलै, २०१४ रोजी माळीण दुर्घटनेतील आपादग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाखांचे अर्थसहाय्य.

७) २०१४-१५साठी सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी ३४ कोटींची मदत. त्यातून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटीची मदत.

८) आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मुलांच्या शिक्षणासाठी १ कोटीची तरतूद.

वैद्यकीय मदतीने अनेकांना आधार

मंदिर न्यासाकडून गरजवंतांना उपचारासाठी व अन्य किचकट शस्त्रक्रिया, असाध्य रोगांसाठीही मदत करण्यात येते. वैद्यकीय मदतीपोटी न्यास जास्तीत जास्त २५ हजाराची मदत करते. त्याचा चेक हॉस्पिटलच्या नावाने काढण्यात येतो. वैद्यकीय मदतीसाठी न्यास प्रतिवर्षी १२ कोटींची मदत करतो.

१) कॉकलर इन्फॅन्टसाठी एक लाखांची मदत केली जाते.

२) न्यासाची स्वत:ची डायलेसिस यंत्रणा आहे. त्यात २१ मशीन्स आहेत. ४२ पेशंटचे प्रतिदिन डायलेसिस करण्यात येते.

३) केईएम, वाडिया या हॉस्पिटलला वैद्यकीय साहित्यासाठी मदत करण्यात येते. वाडिया हॉस्पिटलला न्यासाने दीड कोटींची मदत केली होती. त्यातून हॉस्पिटलमध्ये एनआयसीयू सेंटर उभारण्यात आले. तसेच इतर बाबींसाठीही न्यासाने १५ लाखांची मदत केली आहे. केईएमसाठी न्यासाने २७ लाखांची मदत केली आहे.

४) ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये वॉशिंग मशीन बसवण्यासाठी १५ लाखांची मदत करण्यात आलेली आहे.

५) राज्यातील सगळ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये १०२ डायलेसिस मशीन बसवण्यासाठी साडेसात कोटींची मदत करण्यात येणार आहे.

सामाजिक उपक्रम

पुस्तक पेढी

आर्थिकदृष्टया गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी न्यासातर्फे पुस्तक पेढी चालवण्यात येते. त्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात येते. या पेढीच्या माध्यमातून ११वी व १५वीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद आहे.

ग्रंथालय, अभ्यासिका मंदिर न्यासाकडून ग्रंथालय व अभ्यासिका चालवण्यात येतात. ग्रंथालयात आठ हजार विविध विषयांवरील पुस्तके आहेत. अभ्यासिकेचाही शेकडो विद्यार्थी लाभ घेत आहेत. न्यासाकडून डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित लायब्ररीही चालवण्यात येत आहे.

डायलेसिस सेंटर

न्यासाकडून डायलेसिस सेंटर चालवण्यात येते. ३ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे रुग्ण डायलेसिससाठी न्यासाकडे अर्ज करू शकतात. रुग्णांकडून कन्झ्युमेबल्स सामग्रीचे फक्त २५० रुपये घेण्यात येतात.

न्यासाचे काम समाजासाठीच

न्यासाचे वार्षिक उत्पन्न ७० कोटींचे आहे. त्यातून विविध उपक्रम राबवण्यात येतात. मदत करण्यात येते. मंदिर न्यासाकडून आतापर्यंत हजारो गरजवंतांना मदत करण्यात आलेली आहे. शासन आदेशानुसार वर्षातून तीनदा लिलाव करण्यात येतात.

गणपतीसाठी वापरता येण्यासारखे साहित्य बाजूला काढून लिलाव करण्यात येतो. नामांकित ज्वेलर्सकडून सोने-चांदी या धातूंचा भाव काढल्यानंतर लिलाव करण्यात येतो. लिलावात न गेलेले सोने बँकेत ठेवण्यात येते. असे १० किलो सोने सध्या बँकेत ठेवण्यात आलेले असून त्यापोटी एक टक्का व्याजही न्यासाला मिळते.

४४ किलो सोने केंद्राच्या योजनेसाठी देत आहोत. न्यासाकडे भाविकांच्या देणगीतून तसेच लिलावातून जमा होणा-या रकमेचा वापर सामाजिक कामांसाठीच करण्यात येतो. न्यासाकडून विविध संस्थांना देण्यात येणा-या निधीवर देखरेख ठेवण्याचे, त्याचा पाठपुरावा करण्याचे कामही करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *