अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, पाच चिमुकल्यांना चावा

अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर गणपती मंदिराजवळ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच मुलं जखमी झाली आहेत. सर्व जखमी मुलं दोन ते पाच वर्ष वयोगटातील आहेत.

घराशेजारी खेळताना प्राजक्ता गायकर (वय 5 वर्ष) आणि अंजन कृष्णा (वय 6 वर्ष) या दोन मुलींचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला. तर आजीच्या कडेवर असलेल्या सहा महिन्यांची काव्यावरही कुत्र्याने हल्ला केला. याशिवाय इतर दोन मुलं रस्त्यावरुन जात असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांचा चावा घेतला.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या मुलांना सुरुवातीला अंबरनाथ पालिकेच्या बी.जी. छाया रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी रेबीजचं इंजेक्शन नसल्याने त्यांना बदलापुरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार करुन सर्व मुलांना घरी पाठवण्यात आलं.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यात पालिका प्रशासनाला नेहमीच अपयश आले आहे. मात्र या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *