येत्या १ एप्रिलपासून दारूच्या भट्टय़ा उद्ध्वस्त करा

पाटणा- येत्या १ एप्रिलपासून बिहारमध्ये दारूच्या भट्टय़ा बिनधास्तपणे उद्ध्वस्त करा, असे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील महिलांना दिले आहेत. बिहारमध्ये १ एप्रिलपासून दारूबंदी लागू होणार आहे.

येथे कुमार म्हणाले की, देशी दारूच्या भट्टय़ा बिनधास्तपणे उद्ध्वस्त करून टाका, तसेच गरज लागल्यास कॉल सेंटरला फोन करा. हे सेंटर पाटण्यात उभारण्यात येणार आहे. एखाद्या नागरिकाला अवैध दारूच्या धंद्याविषयी तक्रार करायची असल्यास त्याने ती कॉल सेंटरला कॉल करून करावी.

बिहारमध्ये महिलांनी दारूबंदीची चळवळ मोठी मोहीम म्हणून हाती घ्यावी. कुमार यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दारूबंदीचे आश्वासन दिले होते. आता सत्तेवर आल्यानंतर त्याची पूर्तता केली जात आहे. मात्र, भारतात बनवलेली परदेशी दारू महापालिका व नगर परिषद हद्दीत मिळू शकेल. ही दुकाने बिहार राज्य कॉर्पोरेशनमार्फत चालवली जातील. सहा महिन्यानंतर ही दारूची दुकानेही बंद करण्यात येतील. त्यानंतर राज्यात संपूर्णपणे दारूबंदी लागू केली जाईल. हा निर्णय वास्तववादी असून त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

बिहार सरकारने शेजारच्या राज्यांनाही सीमेवर दारूबंदीबाबतच्या गस्ती वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

१ एप्रिल २०१६पासून बिहारमध्ये या राज्यातून दारूची वाहूतक होता कामा नये, असे बिहारने बजावले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *