हैदराबाद विद्यापीठाच्या दलितविरोधी भूमिकेच्या विरोधात ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी या विद्यापीठाने दिलेली डी. लिट पदवी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना वाजपेयी म्हणाले की, या प्रकरणात आत्महत्या केलेला दलित विद्यार्थी रोहित वेमुला याला लेखक व्हायचे होते. दलितविरोधी भूमिका व असहिष्णुतेमुळे त्याला आत्महत्येला जवळ करावे लागले. याच्या निषेधार्थ आपण डी. लिट पदवी हैदराबाद विद्यापीठाला परत करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाची कृती ही मानवी मूल्यांना आणि ज्ञानाला कमीपणा आणणारी आहे. वाजपेयी यांना हैदराबाद विद्यापीठाने काही वर्षापूर्वी डी. लिट पदवी दिली होती.
देशातील वाढत्या असहिष्णुता व हिंसाचाराविरोधात पंतप्रधान मोदी हे मौन सोडत नसल्याने वाजपेयी यांनी पहिल्यांदा साहित्य अकादमी पुरस्कार सरकारला परत करून त्याचा निषेध केला. वाजपेयी यांच्यानंतर जवळपास ३९ ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांचे पुरस्कार परत केले. वाजपेयी यांना १९९४ मध्ये ‘कही नही वही’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.