केईएम’ने गाठली नव्वदी

केईएम’ने गाठली नव्वदी

परळ येथील महानगरपालिकेचे केईएम रुग्णालय २२ जानेवारी २०१६ रोजी नव्वदी साजरी करणार आहे. या रुग्णालयाने आतापर्यंत गोरगरीब जनतेवर स्वस्तात उपचार केलेच; पण त्यासोबतच यातील वैद्यकीय महाविद्यालयाने तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिकांना घडवले. नव्वद वर्षाच्या प्रवासात या रुग्णालयात ऊन व पाऊस दोन्ही अनुभवले. पण, न डगमगता रुग्णालय रुग्णसेवा देतच राहिले. राज्याच्या कानाकोप-यातून लोक आजही या रुग्णालयात उपचारासाठी येतात. विशेष म्हणजे, या रुग्णालयाला चार पिढय़ांचा यशस्वी वारसा लाभला आहे. खेडय़ापाडय़ातून मुंबईत उपचारासाठी यायचं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठावर ‘केईएम’चंच नाव असतं. रुग्णसेवा करून रुग्णालयाने कमावलेला हा विश्वास अजूनही कायम आहे. कारण, खासगी रुग्णालयात अत्याधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असतानाही सध्या गरीब व्यक्तींसह श्रीमंत लोकही अनेकदा केईएमचा पर्याय निवडतात. पण, केईएम रुग्णालय हा ‘वटवृक्ष’ कसा तयार झाला याबाबत अनेकांना कदाचित माहीतही नसते. पण नव्वदाव्या वर्षानिमित्ताने रुग्णालयाचा हा खडतर प्रवास..

१९२६पर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय (जे.जे.) हे एकमेव महाविद्यालय होते. या ग्रँट महाविद्यालयात ब्रिटिश वंशातील शिक्षकांना प्राधान्य देत असे. सुरुवातीला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ इंडियन मेडिकल सव्‍‌र्हिसेस (आयएमएस)मधील व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रातील अध्यापन करू शकत असत आणि इंग्लंडमध्ये वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेल्या भारतीयांनाही तिथे अध्यापन करण्यास मज्जाव होता. त्यामुळे, भारतीय वंशाचे डॉक्टर या दुजाभावामुळे अत्यंत नाराज होते. ब्रिटिशांची सत्ता असल्याने भारतीय डॉक्टर्स काहीच करू शकत नव्हते. अशी बिकट परिस्थिती देशात असताना देशप्रेमाने प्रेरित होऊन त्याकाळी कपडय़ांचे व्यापारी असणा-या सेठ गोर्धनदास सुंदरदास या व्यक्तीने २८ लाख रुपये देणगी देऊन ८ एकर जमिनीवर शैक्षणिक संस्था सुरू केली. त्यानंतर या व्यक्तीच्या धाडसाला पाहून ब्रिटिश सरकारने या संस्थेच्या आवारात २२ जानेवारी १९२६ रोजी रुग्णालय उभारले. पूर्वी रुग्णालयात सात प्रमुख विभाग होते. आता ४८ विभाग तयार करण्यात आलेले आहेत. डॉ. जीवराज मेहता हे संस्थेचे पहिले अधिष्ठाता होते. त्यानंतर अनेक दिग्गजांनी हे अधिष्ठातापद भूषविले. त्यावेळी लावण्यात आलेल्या एका लहानशा रोपटय़ाचे आता मोठय़ा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आता वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ डॉ. अविनाश सुपे या संस्थेचे अधिष्ठाता आहेत.

९० वर्षाचे प्रवास वर्णन

महाविद्यालय सुरू झाले तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या २५ होती. तर शिक्षकांची संख्या १०-१२ इतकी होती. नव्वद वर्षानंतर आता वैद्यकीय महाविद्यालयात १,५०० शिक्षक कार्यरत असून दरवर्षी १८० विद्यार्थी नव्याने दाखल होतात. याशिवाय रुग्णालयात खाटांची संख्या १०० इतकीच होती. मात्र, आता वाढत्या लोकसंख्येमुळे या खाटांची संख्या २,२८० इतकी झाली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन या क्षेत्रामध्ये हे रुग्णालय आघाडीवर आहे. सुमारे २००० वैद्यकीय विद्यार्थी (पदवी व पदव्युत्तर) एकावेळी येथे प्रशिक्षण घेत असतात. नर्सिग, व्यवसायोपचार आणि भौतिक उपचार या शाखांमधील प्रशिक्षणाव्यतिरिक्त मूलभूत शास्त्रामध्ये मास्टर्स व पीएच.डी.चे प्रशिक्षण दिले जाते. सध्या रुग्णालयात ४०० हून अधिक डॉक्टर्स व ८८६ निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. या रुग्णालयात वर्षाला अंदाजे १९ लाख रुग्णांवर बाह्यरुग्ण व ८५,००० रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येतात. यातील बरेचसे रुग्ण आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असल्याने त्यांच्यावर विनामूल्य उपचार होत आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

आतापर्यंतचे रेकॉर्ड

  • १९२८ साली या संस्थांमधील एम.डी व एम. एस. अभ्यासक्रमाला मान्यता
  • १९६५ रोजी देशातील पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण
  • १९६६ साली पहिला हृदयरोग अतिदक्षता विभाग सुरू
  • १९८४ला आपत्कालीन चिकित्सालयीन सूक्ष्मजीवशास्त्र सुरू
  • १९८८ला एचआयव्ही व एड्स विभाग सुरू
  • १९९०ला बालरोग व नवजात अर्भकांसाठी स्वतंत्र विभाग
  • देशातील पहिले टेस्ट टय़ूब बेबी सेंटर

भविष्यातील प्रकल्प

  • २७ फेलोशिप अभ्यासक्रम सुरू
  • बालत्वचारोग चिकित्सा व मधुमेह समुपदेशक विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत करणार
  • संसर्गजन्य आजारांमध्ये डी. एम. (अतिविशेष पदव्युत्तर) अभ्यासक्रम सुरू करणार
  • कार्डिएक कॅथ लॅबही तयार करणार
  • लैंगिक अत्याचारांना बळी पडणा-या महिलांसाठी स्वतंत्र केंद्र
  • यकृत निकामी झालेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग
  • प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बायोएथिक्स विषय शिकवला जाणार
  • मोठय़ा व्यक्तींसाठी स्वतंत्र थॅलेसेमिया विभाग सुरू करणार

अनेकांच्या चेह-यांवर फुलवले हसू

या रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभाग १९६१ साली सुरू करण्यात आला. आगीत किंवा अपघातात भाजलेल्या त्वचेची जी हानी झालेली असते ती भरून काढणे व त्वचा पूर्ववत दिसावी यासाठी रुग्णालयात हा विभाग सुरू केला होता. त्यानंतर १९८० साली केईएममध्ये जळीत वॉर्ड तयार करण्यात आला आहे. पालिका रुग्णालयातील हा पहिला असा विभाग होता जिथे भाजलेल्या रुग्णांवर उपचार केले जात होते. आता दरवर्षी रुग्णालयात ८-१० हजार रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येते. या विभागांतर्गत ‘मायक्रो व्हॅस्कुलर’ सर्जरीसुद्धा करण्यात येते. रुग्णालयात ९० टक्के रुग्ण हे अपघातामुळे जळालेले येतात. यात चेह-यावर, पाय, हात व मानेला गंभीर भाजलेले असते. अनेकदा हे रुग्ण अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात येतात. अशा स्थितीत उपचार करणं डॉक्टरांसाठी आव्हान असतं. याशिवाय कर्करोगावर उपचार करताना अनेकांच्या त्वचेची हानी होते. शरीरातील एखाद्या भागात कर्करोग झाला असेल तर तो भाग काढून टाकण्यात येतो. अशावेळी ती मोकळी जागा भरण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली जाते. अशीच कर्करोग झालेली लहान मुलं रुग्णालयात उपचारासाठी येतात. पण त्यांच्या मनात एक विशिष्ट पद्धतीचा न्यूनगंड तयार झालेला असतो. या मुलांनी आनंदी आयुष्य जगावे याकरिता रुग्णालयातर्फे या सर्व मुलांसाठी एका शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते, अशी माहिती प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांनी दिली.

आदिवासी पाडय़ांतील रुग्णांना ऑनलाईन डॉक्टरांचा सल्ला

१९५९ साली रुग्णालयात पहिल्यांदाच सामाजिक वैदीक विभाग सुरू करण्यात आला. त्यानंतर आता २००६ मध्ये ‘टेली-मेडिसिन’ सुरू करण्यात आले आहे. याचा अर्थ या विभागातील काही डॉक्टरांची विविध झोपडपट्टी व आदिवासी पाडय़ांत बदली करण्यात येते. हे डॉक्टर तेथे राहून परिसरातील रुग्णांची काळजी घेतात. घरोघरी जाऊन आजाराचे निदान करतात. रोग होऊ नये म्हणून टिकाकरण करतात. याकरिता रुग्णालयाने खडवली व सकवाल ही दोन गावं दत्तक घेतली आहेत. तसेच रुग्णांना सल्ला हवा असल्यास केईएम रुग्णालयातील डॉक्टर यांच्याशी ऑनलाईन बोलतात. साधारणत: विविध जिल्ह्यांतील ५६ केंद्रं या टेली-मेडिसिन उपक्रमाद्वारे जोडण्यात आलेली आहेत. २००६ साली ३४५ लोकांवर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर आता २०१५-१६ पर्यंत ६,२३० रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक वैदीक विभागाच्या प्रमुख डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *