पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत, मात्र ही दृष्टी वास्तवात बदलण्यासाठी त्यांना चांगल्या वैज्ञानिक सल्लागारांची गरज असल्याचे मत भारतरत्न पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ सी.एन.आर. राव यांनी व्यक्त केले आहे. धर्म आणि विज्ञान यांची सरमिसळ केली जाऊ नये, तसेच भारत हा असहिष्णू देश नाही, अशीही मते त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
नरेंद्र मोदी यांच्याकडे नक्कीच भविष्यकाळाबाबतची दृष्टी आहे आणि ते काही करू इच्छितात यात काही शंका नाही. तुम्ही त्यांचे बोलणे ऐकता तेव्हा ही गोष्ट लक्षात येते. मात्र कुणी एक व्यक्ती किंवा एखादे मंत्रालय विज्ञानाच्या किंवा समाजाच्या प्रचंड समस्या सोडवू शकत नाही. आपल्याला जगाशी स्पर्धा करत गरिबीचा भीषण प्रश्न सोडवायचा आहे. या कामांसाठी पंतप्रधानांना योग्य सल्ला देण्यासाठी योग्य व्यक्ती मिळतील, अशी आपल्याला आशा असल्याचे अनेक पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिलेले राव म्हणाले.
पंतप्रधान विज्ञानाचा पुरस्कार करण्यासाठी काय करू शकतात असे विचारले असता राव म्हणाले की, ज्या चांगल्या संस्था मूलभूत काम करत आहेत, त्यांना किमान निधी देण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. यापूर्वी १०-२० कोटी रुपयांच्या कमी रकमेचे निधीही थांबवण्यात आले. निवडक, पण मोठय़ा प्रमाणावर निधी दिला जाणे आवश्यक आहे. माझ्या कार्यकाळात जो काही निधी मिळाला तो भारतातून नव्हे, तर परदेशातून मिळाला.
मदर टेरेसा यांना अलीकडेच पोपनी संताचा दर्जा दिला. या पाश्र्वभूमीवर तुम्ही चमत्कार आणि विज्ञान यांचे समर्थन कसे करता, असा प्रश्न ‘पाँटिफिशियल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’चे सदस्य असलेल्या राव यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आमच्या अकादमीचा याबाबतीत पोप यांच्याशी काही संबंध नाही. ते चर्चेसचे काम पाहता आणि चर्चने टेरेसांना संत बनवले आहे. आम्ही संतांबाबत विचार करत नाही.
आपला चमत्कारांवर विश्वास नसल्याचे राव यांनी स्पष्टपणे सांगितले भारत सहिष्णूच धर्म आणि विज्ञान यांची सरमिसळ केली जायला नको, तर त्यात समतोल साधायला हवा. तुम्ही टोकाची भूमिका घेऊन जहालवादी व्हाल आणि प्रत्येक गोष्टीला विरोध कराल, तर तुम्ही असहिष्णू बनाल. भारत असहिष्णू होत आहे, असे मला वाटत नाही. समाजात काही प्रमाणात असहिष्णुता असली तरी सुदैवाने बहुतांश भारतीय सहिष्णूच आहेत.