गेल्या दोन दिवसांपासून पंजाबमधील पठाणकोटच्या हवाईदलाच्या तळावर (एअरबेस) लपलेल्या दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी पुन्हा हल्ला केला असून हवाईदलाच्या इमारतीतून पुन्हा गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. दोन किंवा त्यापेक्षा जास्त अतिरेकी परिसरातच दडले असून ते अधूनमधून हल्ले करत आहे. त्यांच्या शोधासाठी कमांडोंनी शोधमोहीम पुन्हा सुरू केली असून दहशवाद्यांनी गोळीबार करत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या चकमकीत आत्तापर्यत एकूण ५ दहशतवादी ठार झाले असून ७ जवान शहीद तर २० जण जखमी झाले आहे. शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शनिवारी पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी भारत-पाकिस्तान सीमेपासून ३५ कि.मी. अंतरावरील पठाणकोटच्या एअरबेसला लक्ष्य बनविले. त्यानंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र शोधमोहिमेदरम्यान हवाई दलाच्या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याचे समोर आले असून गेल्या ४० हून अधिक तास ही चकमक सुरू आहे. काल पाचव्या दहशतवाद्यालाही ठार मारण्यात जवानांन यश आले. अंधारामुळे शनिवारी रात्री मोहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू होताच आणखी दोन अतिरेकी दडून असल्याची माहिती मिळाली. लागूनच असलेल्या घनदाट जंगलामुळे अतिरेक्यांच्या नेमक्या संख्येबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. माहिती मिळताच त्वरित मोहीम हाती घेण्यात आल्यामुळे एअरबेसच्या तांत्रिक क्षेत्राचे नुकसान झालेले नाही.