भूकंपाच्या तीव्र धक्क्याने ईशान्य भारत हादरला असून त्यात ६ जण ठार तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. आज पहाटे भारत-म्यानमार सीमेवर भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल एवढी मोजली गेली. भूकंपामुळे घरांना तडे जाऊन खांब कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून मणीपूरमध्ये सर्वाधिक नुकसान झाले तर इंफाळमध्ये ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी शहरातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसामच्या मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही चर्चा करुन तात्काळ मदत देण्याची सूचना केली आहे. मदकार्यासाठी NDRFची टीम इंफाळला रवाना झाली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू इंफाळपासून ३३ कि.मी दूर असल्याची माहिती मिळाली आहे. भारतातील आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, बिहार, झारखंड राज्यासह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. बांगलादेश, म्यानमारमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार आज सकाळी पहाटे साडेचारच्या सुमारास भारत-म्यानमारच्या सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले गेले. भूकंपाचा केंद्रबिंदू इंफाळपासून ३३ कि.मी दूर असल्याचे समजते.
भूकंपामुळे इम्फाळमध्ये घराचं मोठं नुकसान झाले असून शेकडो भिंतीना तडे गेले तर काही ठिकाणी भिंती कोसळल्या असल्याच चित्र दिसते आहे. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले आणि गल्ली, रस्त्यावर एकत्र आल्याच चित्र होते