राज आले, कुणी नाही पाहिले!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शहरातील विकासकामांची पाहणी ‘मनसे’ स्टाईलच केली. दोन-तीन ठिकाणे सोडली तर बहुतांश ठिकाणची पाहणी त्यांनी आपल्या आलिशान एसी गाडीत बसूनच केली. विशेष म्हणजे सिंहस्थातील सर्वात वादग्रस्त ठरलेल्या आणि ८२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या साधूग्रामची पाहणीसुद्धा त्यांनी गाडीतूनच केल्याने त्यांच्या प्रतिक्षेतील साधूही अवाक् झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी ठाकरे आले पण कोणी नाही पाहिले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

नगरसेवकांसह अधिकाऱ्यांच्या हमखास सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारीच ठाकरे यांचा दौरा असल्याने नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांमध्येही उत्साह दिसत नव्हता. तर ठाकरे यांनीही आपले दौऱ्याचे सोपस्कार आपल्या सोयीने पार पाडले. नियोजित दौऱ्याला फाटा देत सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकपासून सुरुवात केली. त्यानंतर कामटवाडा पूल, एबीबी सर्कल, मखमलाबाद रोड, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, साधुग्राम आणि रामकुंड, सराफ बाजार असा दौरा केला. त्यात जॉगिंग ट्रॅक, कामटवाडा पूल, मखमलाबाद रोड सोडता, उर्वरित ठिकाणांची गाडीत बसूनच पाहणी केली. उन्हाचाही चढलेल्या पाराचा परिणाम त्यांच्या दौऱ्यावर झाला. रिंगरोडसह साधूग्राम त्यांनी उभ्या उभ्या गाडीतून पाहिला. साधुग्रामला ठाकरे तर गाडीच्याही बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी थांबलेल्या साधूंना त्यांची भेट होवू शकली नाही. त्यामुळे ठाकरे आले पण आम्ही नाही पाहिले अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तर रामकुंडावर त्यांचे बॅण्डबाजा वाजवून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर थेट विश्रामगृहावर जावून अधिकारी आणि काही संस्थाशी चर्चा केली. त्यानंतर विश्रामासाठी हॉटेल एक्सप्रेस इनकडे प्रयाण केले.

नगरसेवकांनी फिरविली पाठ

रविवारच्या दौऱ्यात राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवली. महापौर अशोक मुर्तडक, सभागृहनेते सलिम शेख, जिल्हाध्यक्ष शशिकांत जाधव, सुदाम कोंबडे, गटनेता अनिल मटाले यांच्यासह नऊ ते दहा नगरसेवकच ठाकरे यांच्या दौऱ्याला उपस्थित होते. त्यामुळे नगरसेवकांच्या नाराजीची पुन्हा चर्चा सुरू झाली. अनेक नगरसेवक कामे होत नसल्याने नाराज आहेत. तर अनेकांवर गिते समर्थक असल्याचा शिक्का मारल्याने वर्तमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे मनसेत सध्या किती नगरसेवक आहेत, हे सांगणेही अवघड झाले आहे.

श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न

रामकुंडावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या टोलमुक्तीच्या निर्णयाबद्दल ठाकरे यांच्या उपस्थितीत वाजत गाजत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. हा कार्यक्रम रस्त्या ऐवजी रामकुंडावर घेण्यात आल्याबद्दल रामकुंडावरीलच लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *